पुणे : पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमधील बहुसंख्य साखर कारखाने शेतकऱ्यांना ऊसाची एफआरपी अदा करत आहेत. मात्र, सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखाने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपीपासून वंचित ठेवले आहे. तसेच जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी अद्याप ऊसाचा दरही जाहीर केलेला नाही. या पार्श्वभूमीवर पुणे साखर संकुल येथे सोलापूर युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले.
या संदर्भात साखर आयुक्तांना वारंवार निवेदन देऊन कारखान्यांना आदेश देण्याची विनंती केली. मात्र, त्यावर अद्याप कार्यवाही झालेली नाही. प्रशासन आणि साखर कारखानदार यांच्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.
झोपी गेलेल्या प्रशासनाला जाग आणण्यासाठी आणि शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी शिवसेनेच्या वतीने साखर आयुक्तालयासमोर मोहोळ तालुका शिवसेना पक्षाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले.
नागेश वनकळसे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे तालुका प्रमुख अशोक भोसले, उपतालुका प्रमुख बाळासाहेब वाघमोडे, विद्यार्थी सेना जिल्हा प्रमुख हर्षल देशमुख, अभिजित भोसले, गणेश लाखदिवे, प्रीतम सुतार यासह शिवसैनिक उपस्थित होते.