कॅनबेरा – एकदिवसीय सामन्यांची मालिका गमावल्यानंतर कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ आज यजमान ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेत सहभागी होत आहे. या दोन संघात आज होत असलेल्या पहिल्या सामन्यासह निदान या मालिकेत तरी विजयी सलामी देण्यासाठी भारतीय संघाचेच पारडे जड मानले जात आहे.
मनुका ओव्हल याच मैदानावर एक तपानंतर भारतीय संघाने विजयाचा दुष्काळ बुधवारी संपवताना अखेरचा एकदिवसीय सामना जिंकला. आता त्यापेक्षाही वेगवान सामन्यांची मालिका सुरू होत असून नुकत्याच अमिरातीत पार पडलेल्या आयपीएल स्पर्धेतील भारतीय खेळाडूंची कामगिरी जास्त भरीव झालेली होती. त्यामुळे या मालिकेत भारतीय संघाचेच पारडे जड राहण्याची शक्यता आहे. एकदिवसीय मालिका 2-1 अशी गमावली असली तरीही अखेरच्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाने अपयश धुवून काढताना विजयाची नोंद केली.
टी-20 क्रिकेटचा सराव ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंपेक्षाही जास्त भारतीय संघाला आयपीएल स्पर्धेतून मिळाला असल्याने कोहली आणि कंपनीला यजमान संघावर वर्चस्व राखण्याची नामी संधी आहे. कर्णधार कोहलीच्या एखाद दोन सामन्यांतील खेळी वगळता भारतीय संघातील जवळपास सर्वच खेळाडूंना टी-20 चा सराव भरपूर मिळालेला आहे.
त्यातच सलामीवीर मयंक आग्रवाल, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, दीपक चहर, मनीष पांडे, संजू सॅमसन, नवदीप सैनी, जसप्रीत बुमराह, वॉशिंग्टन सुंदर व टी. नटराजन यांनी आयपीएल स्पर्धा गाजवली आहे. त्यांनी अननुभवी असतानाही आपल्या खेळीच्या जोरावर संघाचे विजय साकार केले आहेत. गोलंदाजी जास्त अनुभवी नसली तरीही सैनी, सुंदर, यजुवेंद्र चहल व दीपक चहर यांच्या जोडीला बुमराह व महंमद शमी या अनुभवी गोलंदाजांचा संघात समावेश असल्याने ही मालिका यजमान ऑस्ट्रेलियाला जड जाण्याची शक्यता जास्त आहे.
पंड्या व मॅक्सवेलमध्येच स्पर्धा
आयपीएल स्पर्धेपासून भरात आलेला भारतीय संघाचा अष्टपैलू हार्दिक पंड्या व ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल यांच्यातच या सामन्यात स्पर्धा रंगणार आहे. दोन्ही खेळाडू वादळी फलंदाजीसाठी ओळखले जातात. त्यातच पंड्या जरी सातत्याने आक्रमक फलंदाजी करण्यात यशस्वी ठरत असला तरीही भारतीय गोलंदाजांना मॅक्सवेलला कसे रोखायचे यासाठी योजना तयार करावी लागणार आहे. मॅक्सवेलवर नियंत्रण राखले तरच भारताला विजय सुकर होणार आहे. टी-20 मालिकेनंतर चार सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. बॉर्डर-गावसकर करंडकासाठीची ही मालिका 17 डिसेंबरपासून सुरू होत आहे.
यजमान संघाबाबत बोलायचे झाले तर त्यांचा भरात असलेला सलामीवीर डेव्हिड वॉर्नर दुखापतीमुळे या मालिकेत खेळू शकणार नसल्याने त्यांना सलामीच्या अव्वल पर्यायाची चिंता आहे. अर्थात, ग्लेन मॅक्सवेल भरात आल्यामुळे तसेच स्टिव्ह स्मिथने एकदिवसीय मालिकेत सातत्यपूर्ण कामगिरी केल्यामुळे त्यांची मधली फळी सशक्त आहे.
अखेरच्या एकदिवसीय सामन्यांत भारतीय संघाने विजय मिळवल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास दुणावला आहे. या सामन्यातील भारतीय संघाची देहबोली सर्वात सकारात्मक दिसून आल्यामुळे टी-20 मालिकेत विजयी सलामी देत आघाडी मिळवण्यासाठीच कोहली आणि कंपनी मैदानात उतरेल.