नवी दिल्ली –एखादा खेळाडू संघासाठी लकी असतो असेही अनेकदा म्हटले जाते. जे चित्र सचिन तेंडुलकरचे होते, तेच आता थोड्याफार फरकाने रोहित शर्माबाबत निर्माण झाले आहे. ज्या मालिकांमध्ये रोहितचा संघात समावेश नाही त्यातील अनेक मालिका भारतीय संघाने गमावल्या आहेत. त्यामुळे हिटमॅन नाही तर विजय नाही, असेच चित्र दिसून येत आहे.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाला एकदिवसीय मालिका गमवावी लागली आहे. पहिले दोन्ही सामने भारताने गमावले असून या मालिकेत तसेच पुढे होत असलेल्या टी-20 सामन्यांच्या मालिकेतही रोहितचा संघात समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळेच संघाला हे पराभव स्वीकारावे लागत असल्याचे सांगितले जात आहे. सोशल मीडियावरही अनेकांनी याबाबत पोस्ट केल्या आहेत.
योगायोग म्हणावा की, धक्कादायक चित्र म्हणावे, पण भारतीय संघाने खेळलेल्या गेल्या सातही आंतरराष्ट्रीय सामन्यांत पराभव पत्करला आहे व त्यात विशेष म्हणजे या सातही सामन्यांत रोहितचा भारतीय संघात समावेश नव्हता.
रोहितने गेल्या फेब्रुवारी महिन्यात न्यूझीलंडविरुद्ध अखेरचा सामना खेळला होता. त्याने या टी-20 सामन्यानंतर दुखापतीमुळे मायदेशी प्रयाण केले होते. त्यानंतर मार्चपासून सुरू झालेल्या करोनाच्या संसर्गामुळे सर्व सामने ठप्प झाले होते. त्यानंतर अमिरातीत झालेल्या आयपीएल स्पर्धेत रोहितच्याच नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने विजेतेपद पटकावले होते. या स्पर्धेतही रोहितला दुखापतीने सतावले होते. मात्र, त्याचा संघात समावेश नसेल तर त्या मालिका जिंकणे भारतीय संघाला कठीण जाते हेच आकडेवारीवरूनही सिद्ध होत आहे.
सलग सात सामने गमावले
रोहित संघात नसताना भारताला या वर्षाच्या प्रारंभी न्यूझीलंडकडून एकदिवसीय सामन्यांची मालिका 3-0 अशी गमवावी लागली होती. त्यानंतर दोन कसोटींची मालिकाही 2-0 अशी गमावली होती. त्यानंतर मायदेशी परतलेला भारतीय संघ रोहितच्या अनुपस्थितीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळणार होता. मात्र, धर्मशाला येथील सामना पावसामुळे वाया गेला व त्यानंतर करोनाचा धोका वाढल्याने ही मालिकाही रद्द झाली होती. आजवर रोहितच्या अनुपस्थितीत भारतीय संघाने 3 मालिका व 7 सामने गमावले आहेत. त्यात 5 एकदिवसीय सामने तर 2 कसोटी सामन्यांचा समावेश आहे.