पुणे – राज्यातील इयत्ता दहावी व बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा येत्या एप्रिल-मेमध्ये होणार आहेत. या परीक्षा ऑनलाइन घेणे कठीण असले, तरी काही मार्ग काढण्यासाठी शिक्षण विभागातील तज्ज्ञ मंडळींशी चर्चा सुरू आहे. चर्चा पूर्ण झाल्यानंतर अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे, असे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे.
करोनामुळे शाळा, महाविद्यालये बंद होती. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी विविध पद्धतींचा अवलंब करण्यात येत आहे. ऑनलाइन, ऑफलाइन, टीव्ही, गुगल, व्हॉट्सऍप अशा विविध माध्यमांतून 82 टक्के विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचवण्यात आले आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने शाळा सुरू करण्याचे नियोजन आहे. नववी ते बारावीच्या शाळा सुरू करण्यात आलेल्या आहेत. विद्यार्थी तणावात राहू नये यासाठी अभ्यासक्रमात 25 टक्के कपातही करण्यात आलेली आहे, असे गायकवाड यांनी ट्विटरद्वारे नमूद केले आहे.
दहावी, बारावीच्या परीक्षा दरवर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात येतात. यंदा मात्र हा परीक्षा कधी होणार, परीक्षा ऑनलाइन की ऑफलाइन होणार याबाबत विद्यार्थी, पालकांमध्ये संभ्रम निर्माण आहे. यावर गायकवाड यांनी भूमिका मांडली आहे. सर्व ठिकाणची परिस्थिती पाहून दहावी, बारावीच्या परीक्षा घेण्याचे नियोजन करण्यात येणार आहे.
या परीक्षा ऑनलाइनद्वारे घेण्याबाबतचा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळासमोर ठेवला होता. परंतु दहावीचे, बारावीचे विषय खूप असतात. वेगवेगळ्या भाषाही असतात. त्यामुळे ऑनलाईन परीक्षा घेणे हे त्यांच्या दृष्टीने काहीसे कठीण आहे.
त्यामुळे या दृष्टीकोणातून आधी काही बाबी तपासून घ्याव्या लागतील, असे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे. मात्र तरीही ऑनलाइनद्वारे परीक्षा घेता येतील का यावर विचार सुरू असल्याचेही गायकवाड यांनी नमूद केले आहे.
प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षण घेण्याचा अधिकार आहे. शुल्क न भरल्यामुळे कोणत्याही विद्यार्थ्याला शिक्षणापासून वंचित ठेवणे चुकीचे आहे. तसे करणाऱ्या संबंधित शाळांवर कारवाई होणार आहे, असा इशाराही त्यांनी दिला आहे.