प्रा. शुभांगी कुलकर्णी
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याने काढलेली पितृत्वाची रजा हा सध्या चर्चेचा विषय बनला आहे. त्याबाबत…
भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर 1976 मध्ये न्यूझीलंडमध्ये एका मालिकेत खेळण्यासाठी गेले होते. त्याचदरम्यान त्यांना आपला मुलाच्या जन्माची बातमी समजली. साहजिकच गावसकरांना भारतात परतायचे होते. तसेच भारतीय संघाला त्यानंतर लगेचच वेस्ट इंडिजबरोबर मालिका खेळायची होती.
त्याकाळातील वेस्ट इंडिजचे वेगवान गोलंदाज अक्षरशः भेदक गोलंदाजी करत असत. गावसकरांसारख्या खेळाडूला भीती होती की, मुलाचा चेहरा पाहण्यापूर्वीच एखादा गोलंदाज आपल्याला घायाळ तर करणार नाही ना! ही भीती निराधार नव्हती.
एका सामन्यात वेस्ट इंडिज गोलंदाजांच्या बाउन्सर चेंडूंनी भारतीय संघातील पाच खेळाडूंना घायाळ केले होते. त्यांना इतकी दुखापत झाली होती की थेट रुग्णालयात घेऊन जावे लागले होते. पण गावसकर हे कसलेले फलंदाज होते. त्यांनी याच सामन्यात अत्यंत संयमी पण तडाखेबाज फलंदाजी करत अंशुमान गायकवाडसोबत 131 धावांची भागीदारी केली होती. तथापि, त्यावेळी बीसीसीआयने गावसकरांना परतण्याची परवानगी दिली नाही. परिणामी, जवळपास अडीच महिन्यांनी ते भारतात परतले आणि त्यांनी आपला मुलगा रोहनचा चेहरा पाहिला. क्रीडाविश्वात अनेकदा अशा घडामोडी घडतात ज्यांची खेळातील जय-पराजयापेक्षाही अधिक चर्चा होते. गावसकरांबाबत घडलेल्या या प्रसंगाची तेव्हा बरीच चर्चा झाली होती. आता अशीच चर्चा विराट कोहलीबाबत सुरू आहे.
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार असलेला विराट कोहली ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर असताना ऍडलेड येथील कसोटी सामना खेळल्यानंतर पितृत्वाच्या रजेवर जात आहे. विराटची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा ही जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात आई होण्याची शक्यता आहे. ही गोष्ट ध्यानात घेऊन विराटने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे (बीसीसीआय) पितृत्वाची रजा मागितली होती. त्याची ही मागणी बीसीसीआयने स्वीकारली आहे. यावरून सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.
आधुनिक, उदारवादी व्यवस्थेत पितृत्वाची रजा ही एक महत्त्वाची गोष्ट असून, विराट कोहली हासुद्धा आधुनिक विचारांचा आहे. त्यामुळे पिता बनण्याच्या काळात आपल्या पत्नीसोबत राहण्याचा निर्णय तो घेईल, हे अपेक्षितच होते. तसे पाहायला गेल्यास आता काळही बदलला आहे आणि एकत्र कुटुंबाची संकल्पना पूर्णपणे लयाला गेली आहे. एकत्र कुटुंब पद्धती अस्तित्वात असताना एखादी स्त्री आई होण्याच्या काळात घरात अनेक लोक उपस्थित असत आणि त्यामुळेच संबंधित स्त्रीचा पती तिच्या सोबत असलाच पाहिजे, अशी फारशी गरज नव्हती. परंतु आता कुटुंब ही संकल्पनाच पती-पत्नी एवढ्यापुरती सीमित झाली आहे. त्यामुळे मातृत्वाच्या काळात पतीने आपल्यासोबत असावे, अशी पत्नीचीही इच्छा असणे स्वाभाविकच आहे.
विराट कोहलीच्या या निर्णयावर आक्षेप घेणाऱ्यांचे म्हणणे असे आहे की, देशाचे प्रतिनिधित्व करीत असलेल्या क्रिकेटपटूने कुटुंबाच्या चौकटीबाहेर जाऊन देशाचा विचार करणे गरजेचे आहे. डिसेंबर महिन्यात होत असलेली दुसरी कसोटी खेळल्यानंतरसुद्धा तो माघारी फिरू शकतो, असेही बोलले जात आहे.
यासंदर्भात भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि सचिन तेंडुलकर यांची उदाहरणे दिली जात आहेत. वस्तुतः महेंद्रसिंह धोनीच्या मुलीचा म्हणजे जीवाचा जन्म झाला, तेव्हा 2015 मध्ये धोनी ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये झालेल्या आयसीसी विश्वचषक स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व करीत होता. त्यावेळी त्याला एका पत्रकाराने विचारले होते की, मुलीच्या जन्माच्या वेळी कुटुंबीयांसमवेत राहता आले नाही, याचे वाईट वाटते का? त्यावेळी धोनी म्हणाला होता की, यावेळी मी माझ्या देशाचे प्रतिनिधित्व करीत आहे आणि माझ्यासाठी विश्वचषक स्पर्धेत खेळणे अधिक महत्त्वाचे आहे. त्याचप्रमाणे सचिन तेंडुलकर यानेही पित्याचे म्हणजे साहित्यिक रमेश तेंडुलकर यांचे निधन झाले तेव्हा राष्ट्रीय जबाबदारी पूर्ण करणे अधिक महत्त्वाचे मानले होते.
1999 मध्ये इंग्लंड येथे झालेल्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेवेळची ही घटना आहे. या स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेसोबतचा पहिला सामना गमावल्यानंतर भारताला झिबॉम्बवेसोबत दुसरा सामना खेळायचा होता. परंतु सामन्याच्या पूर्वसंध्येलाच सचिनच्या वडिलांचे निधन झाल्याची बातमी आली. अंत्यसंस्कारांना उपस्थित राहण्यासाठी सचिन मुंबईला परतला. अंत्यसंस्कार होताच सचिन तातडीने इंग्लंडला पोहोचला आणि भारताला “सुपर सिक्स’मध्ये स्थान मिळवून देण्यासाठी महत्त्वाची कामगिरी बजावली.
राष्ट्रहिताला सर्वोच्च स्थान देण्याचे उत्तम उदाहरण महेंद्रसिंह धोनी आणि सचिन तेंडुलकर यांनी पेश केले आहे, याबद्दल दुमत असण्याचे कारणच नाही. परंतु द्विपक्षीय मालिकेत खेळणे आणि विश्वचषक स्पर्धेत खेळणे यात फरक आहे, हेही आपण समजून घेतले पाहिजे. या दोन्हीचे महत्त्व वेगवेगळे आहे. विराट कोहलीवर ही वेळ विश्वचषक स्पर्धेदरम्यान आली असती, तर कदाचित त्यानेही राष्ट्रहितालाच अधिक महत्त्व दिले असते.
कुटुंबापेक्षा क्रिकेटमधील जबाबदारीला झुकते माप देण्याचे उदाहरण कोहलीनेही दाखवून दिले आहे. डिसेंबर 2006 ची ही गोष्ट आहे. त्यावेळी कोहली फिरोजशहा कोटला मैदानावर कर्नाटकविरुद्ध रणजी सामना खेळत होता. तो 18 धावांवर खेळत असतानाच त्याचे पिता प्रेम कोहली यांचे निधन झाल्याचे वृत्त येऊन थडकले. पित्याचे अंत्यसंस्कार केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मैदानात उतरून विराटने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिलाच; पण 90 धावा काढून संघाला फॉलोऑनच्या नामुष्कीपासून वाचविले.
कोहलीचे संघाच्या दृष्टीने महत्त्व खूपच मोठे आहे, परंतु त्यामुळे संघाने पूर्णपणे विराटवरच अवलंबून राहावे, हेही योग्य नव्हे. शिवाय, पितृत्वाची रजा घ्यायची की नाही, हा पूर्णपणे त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे. स्टार क्रिकेटपटू जेव्हा क्रिकेटचा संन्यास घेतात, तेव्हा तो त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे असे म्हटले जाते. त्याच प्रकारे महत्त्वाच्या क्षणी त्याने क्रिकेटला महत्त्व द्यावे की कुटुंबाला, हा विराटचा व्यक्तिगत निर्णय आहे. या निर्णयाचा सन्मान आपण केला पाहिजे.