कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी यापुढे शहरातील सर्वच भाजी विक्रेत्यांनी मास्क नाही-भाजीपालाही नाही, अशी भूमिका घेऊन ती कठोरपणे राबवावी, असे आवाहन महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केले.
आजच्या 82 व्या स्वच्छता मोहिमेत महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी हातात झाडु घेऊन पंचगंगा घाटावरील स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. डॉ.बलकवडे यांनी मोहिमेंतर्गत स्वच्छता तर केलीच पण पंचगंगा घाट येथील भाजी व फळविक्रेत्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क व हॅण्डग्लोज वापरणे आणि सामाजिक अंतराचे पालन करणे बंधनकारक असून भाजी खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांना मास्क व सामाजिक अंतराचे पालन केल्याशिवाय भाजीपाला तसेच फळांची विक्री करुन नये, असे आवाहनही केले.
स्वच्छता अभियानातून कोल्हापूर शहर स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी बनविण्यासाठी नागरिकांनी स्वच्छता मोहिमेत सक्रीय सहभाग घ्यावा, असे आवाहनही डॉ.कादंबरी बलकवडे यांनी केले. यावेळी आरोग्यधिकारी डॉ. अशोक पोळ, मुख्य आरोग्य निरिक्षक जयवंत पोवार, स्वरा फौंडेशनचे प्रमोद माजगांवकर आदिजण सहभागी झाले.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शहरातील फळ आणि भाजीविक्रेत्यांनी मास्क व हॅण्डग्लोज वापरणे, सामाजिक अंतराचे पालन करणे, कोठेही न थुंकणे, सॅनिटायझर वापरणे आणि गर्दीत न करु देणे या गोष्टीं महत्वाच्या असल्याचे सांगून प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे म्हणाल्या, “कोरोना कमी झाल्याचे दिसत असले तरी त्याचा धोका टळलेला नसल्याने नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचे काटेकोरपणे पालन करावे”.
पंचगंगा घाट येथील भाजी विक्रेत्यांना नो मास्क नो एन्ट्री उपक्रमासंदर्भात माहिती दिली. तसेच स्वच्छ सर्व्हेक्षण 2021 च्या अनुषंगाने स्व्च्छता ॲप डाऊनलोड व त्याचा वापर याबाबत उपस्थितांना माहिती देण्यात आली.