पाटणा – बिहारचे पूर्ण चित्र स्पष्ट होण्याची प्रतीक्षा सगळ्यांनाच असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्या राज्याचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. मात्र, त्यांच्यातील चर्चा गुलदस्त्यात राहिली.
बिहारच्या निकालाबाबत शहा आणि नितीश यांच्यात चर्चा झाल्याचे समजते. त्या राज्याची सत्ता राखण्याच्या स्थितीत एनडीए असल्याचे चित्र आहे. मात्र, भाजपने मारलेल्या मुसंडीमुळे एनडीएची समीकरणे बदलली आहेत. जागांचा विचार करता भाजपने जेडीयूला खूप मागे टाकले आहे.
त्यामुळे पुन्हा एनडीएचे सरकार स्थापन झाल्यास नितीश यांच्याकडेच धुरा राहणार की मुख्यमंत्रिपद भाजपकडे जाणार, याविषयी तर्क-वितर्क सुरू झाले आहेत. कुणी कितीही जागा जिंकल्या तरी नितीश हेच मुख्यमंत्री असतील, अशी भूमिका भाजपने सुरूवातीपासून मांडली आहे. त्यापार्श्वभूमीवर, शहा आणि नितीश यांच्यातील दूरध्वनी संभाषणाचे महत्व वाढले आहे.