नवी दिल्ली : देशातील काही भागात सध्या जोरदार पाऊस सुरु आहे. तर काही भागात अद्यापही पावसाने ओढ दिली आहे. त्यातच हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार 1 जूनपासून आत्तापर्यंत संपूर्ण देशभरात सरासरीच्या 91 टक्के पाऊस झाला असल्याचे सांगण्यात आले आहे. दरवर्षी 30 ऑगस्टपर्यंत देशात 687 मिमी सर्वसाधारणपणे पाऊस होत असतो, यावर्षी मात्र प्रत्यक्षात 627 मिमी पावसाची नोंद झाल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे केरळसह महाराष्ट्रात पावसाची मोठी तूट असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.
हवामान विभागाकडून देशात आत्तापर्यत झालेल्या पावसाची माहिती देण्यात आली आहे. देशात सरासरीच्या 9 टक्के पाऊस कमी झाला आहे. आत्तापर्यंत देशात 91 टक्के पाऊस झाला आहे. यामध्ये केरळमध्ये यावर्षी पावसाची मोठी तूट पाहायला मिळात आहे. जूनपासून केरळात आत्तापर्यंत सरासरीच्या 48 टक्के पावसाची तूट झाली आहे.
दरम्यान, मध्य महाराष्ट्रात सरासरीच्या 22 टक्के पावसाची तूट झाल्याचे पाहायला मिळत आहे. मराठवाड्यात देखील 1 जूनपासून सरासरीच्या 19 टक्के पावसाची तूट पाहायला मिळत असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.
ऑगस्ट महिन्याचा विचार केला तर राज्यात सरासरीच्या उणे 58 टक्के तूट निर्माण झाली आहे. कारण, ऑगस्ट महिन्यात सरासरीच्या फक्त 42 टक्के पाऊस झाला आहे. सर्वात विदारक परिस्थिती मराठवाड्यात आहेत. कारण तिथं सरासरीच्या केवळ 28 टक्के पाऊस झाला आहे. त्याखालोखाल मध्य महाराष्ट्र आणि कोकणात केवळ 36 टक्के पाऊस पडला आहे. राज्यातील 15 जिल्ह्यात पावसाच्या सरासरीतली तूट मोठी आहे. या मोठ्या तुटीमुळे आणि पुढचे काही दिवस पावसाची शक्यता नसल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची भीती वर्तवण्यात येत आहे.
राज्यातील 15 जिल्ह्यात पावसाच्या सरासरीतली मोठी तूट निर्माण झाली आहे. सरासरीच्या उणे 20 टक्क्यांहून अधिक तूट आहे. पुढील काही दिवस पावसाची शक्यता नसल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची चिन्ह आहेत. 1 जूनपासून जालन्यात फक्त 54 टक्के पाऊस, सांगली जिल्ह्यात फक्त 56 टक्के पाऊस, अमरावतीत सरासरीच्या फक्त 69 टक्के पाऊस झाला आहे. ऑगस्ट महिन्यात पावसाने पाठ फिरवल्यानंतर, सगळ्यांचे डोळे आभाळाकडे लागले आहेत.