उर्वरित 16 धरणांत फक्त 8.13 टीएमसी पाणी
पुणे – जिल्ह्यातील प्रमुख 24 धरणांपैकी 16 धरणांमध्ये फक्त पाणीसाठा उपलब्ध असून उर्वरित 8 धरणे पूर्णपणे रिकामी झाली आहे.
16 धरणांमध्ये मिळून एकूण फक्त 8.13 टीएमसी इतका पाणीसाठा आहे. जून संपण्यास आला, तरी धरणक्षेत्रात पाऊस झालेला नाही. त्यामुळे नागरिकांचे लक्ष पावसाकडे लागले आहे.
मागील वर्षी मान्सूनचे आगमन वेळेवर झाले. त्यानंतर दोन महिने पावसाने चांगली हजेरी लावल्याने जिल्ह्यातील सर्व धरणे 100 टक्के भरली. त्यामुळे जिल्ह्यातील भिमा खोऱ्यातील धरणांतून पाणी नदीतून सोडण्यात आले. खडकवासला प्रकल्पातील धरणेही पूर्ण भरली. खडकवासला धरणातून सुमारे 19 टीएमसी पाणी नदीत सोडण्यात आले. हे पाणी पुढे उजनी धरणात पोहचते. त्यानंतर मात्र परतीच्या पावसाने निराशा केली. ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात पाऊस न झाल्याने धरणांच्या पाणीतापळीत वाढ झाली नाही. त्यामुळे पाणीसाठा स्थिर राहिला. अपुऱ्या पावसामुळे सर्वच धरणांमधील पाणीसाठा लवकर कमी झाला. त्यामुळे यंदा धरणेही लवकर रिकामी झाली आहेत.
सध्यस्थितीत भिमा खोऱ्यातील 24 धरणांपैकी 16 धरणांमध्येच पाणीसाठा शिल्लक आहे. तर आठ धरणे रिकामी आहे. यामध्ये पिंपळगाव जोगे, येडगाव, वडज, डिंभे, घोड, मुळशी, टेमघर आणि नाझरे या धरणांचा समावेश होतो. धरणात उपलब्ध असलेला पाणीसाठाही अत्यल्प असाच आहे. साधारणपणे जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनचे आगमन होते. त्यावेळी सर्वत्र पाऊस सुरू होऊन जमिनीमध्ये पाणी मुरण्यास सुरुवात होते. यंदा मात्र जून महिनाअखेर आली तरी पाऊस झालेला नाही.