जिनिव्हा – करोनाच्या आपत्तीबाबतची जबाबदार भूमिका पार पाडावी अशी मागणी भारतासह आठ देशांनी मिळून केली आहे, असे संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार उच्चायुक्तालयाने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. संयुक्त राष्ट्रातील भारत, इंडोनेशिया, कंबोडिया, मलेशिया, म्यानमार, फिलीपाईन्स, थायलंड आणि व्हिएतनामच्या कायम प्रतिनिधींनी मिळून ही मागणी केली आहे.
करोनाच्या आपत्तीमुळे संपूर्ण जगात प्रचंड जिवीत आणि वित्त हानी झाली आहे. अशा आपत्तीच्या निवारणार्थ होत असलेल्या प्रयत्नांबरोबरच या आपत्तीची जबाबदारी निश्चिती करण्यात यावी, असे या देशांनी स्थापन केलेल्या आघाडीने संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार आयोगाला लिहीलेल्या पत्रात म्हटले आहे. या संदर्भाचे संयुक्त निवेदनही प्रसिद्धीस देण्यात आले आहे.
18 मे रोजी झालेल्या जागतिक आरोग्य परिषदेत एकमताने ठराव करण्यात आला होता. त्यात सर्व सदस्य देशांना कोविड-19 ने झालेल्या हानीची सविस्तर माहिती देण्याचे आणि चुकीची माहिती न पसरवण्याचे आवाहन केले गेले होते. त्याची आठवण करून देऊन प्रत्यक्ष परिस्थितीचे अवलोकन करून जबाबदारी निश्चित करण्यात यावी, असे या निवेदनात म्हटले आहे.