राधाकृष्ण विखे-पाटील, अर्जुन खोतकर यांना दिलासा
मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या काही उमेदवारांना मोठा धक्का बसला आहे. राज्यभर उमेदवारांनी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जांची शनिवारी छाननी करण्यात आली. यामध्ये 798 उमेदवारांचे अर्ज नामंजुर करण्यात आले आहेत. या उमेदवारांच्या अर्जामध्ये अनेक त्रुटी आढळल्यामुळे ते रद्द करण्यात आले असल्याचे निवडणुक आयोगाने म्हटले आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी राज्यभरामध्ये 5 हजार 543 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यामधील जवळपास 4 हजार 738 अर्ज वैध ठरवण्यात आले. उर्वरीत म्हणजे 798 उमेदवारांच्या उमेदवारी अर्जात काही त्रुटी आढळल्यामुळे ते अवैध ठरवण्यात आले. त्यामुळे या उमेदवारांना धक्का बसला आहे. पुण्यामधील 71 उमेदवारांचे अर्ज अवैध ठरवण्यात आले. नागपूरमध्ये 28 उमेदवार, औरंगाबादमध्ये 4 उमेदवार, सोलापूरमध्ये 137 उमेदवारांचे उमेदवारी अर्ज अवैध ठरवण्यात आले आहे. दरम्यान, राधाकृष्ण विखे-पाटील आणि अर्जुन खोतकर यांना दिलासा मिळाला आहे.