नवी दिल्ली : केंद्र सरकारने तयार केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात गेल्या वर्षभरापासून दिल्लीच्या वेशीवर देशभरातील शेतकरी आंदोलन करत आहेत. केंद्र सरकारने शेतकऱ्यांसोबत वर्षभरात अनेक बैठक घेतल्या मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही. त्यामुळे शेतकरी कायदे रद्द करण्याच्या मागणीवर ठाम आहेत. दरम्यान, भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे . शेतकरी आंदोलनात ज्या शेतकऱ्यांचा मृत्यू झाला, त्यांच्याबद्दल भारत सरकारकडून शोक देखील व्यक्त केला जात नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
एका वृत्तसंस्थेशी बोलताना राकेश टिकैत म्हणाले, “शेतकरी आंदोलनात आतापर्यंत सुमारे ७५० शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. मात्र भारत सरकारकडून त्यांच्या मृत्यूवर शोकही व्यक्त करण्यात आलेला नाही. पंतप्रधान मोदी हे देशातील शेतकऱ्यांचे पंतप्रधान नाहीत, असं शेतकऱ्यांना वाटू लागलंय. शेतकरी देशापासून वेगळे आहेत, असा त्यांच्याबद्दल विचार केला जातोय.”
दरम्यान, या अगोदरदेखील शुक्रवारी राकेश टिकैत यांनी केंद्रावर निशाणा साधला होता. “शेतकरी आंदोलन सोडून कुठेही जाणार नाहीत. जर एखादे सरकार जर पाच वर्षे चालत असेल, तर जोपर्यंत भारत सरकार एमएसपी सुनिश्चित करणारा कायदा करत नाही आणि शेतीचे तीन कायदे रद्द करत नाही तोपर्यंत लोकांचा पाठिंबा असलेले हे आंदोलन सुरूच राहील,” असे ते म्हणाले.
दरम्यान, २६ नोव्हेंबरपर्यंत वादग्रस्त कृषि कायदे रद्द न केल्यास शेतकरी आंदोलन अधिक तीव्र केले जाईल, असा इशारा राकेश टिकैत यांनी काही दिवसांपूर्वी दिला होता. “केंद्र सरकारकडे २६ नोव्हेंबरपर्यंत वेळ आहे. तोपर्यंत त्यांनी कृषि कायद्यांसदर्भात निर्णय घ्यावा, अन्यथा २७ नोव्हेंबरपासून शेतकरी गावागावांतून ट्रॅक्टरने दिल्लीच्या सीमेवर तसेच आसपासच्या आंदोलनस्थळी पोहोचतील आणि भक्कम तटबंदी करतील,” असे ते म्हणाले होते.