वडगाव मावळ -शिष्यवृत्ती परिक्षेच्या निकालावरून शाळांची शैक्षणिक गुणवत्ता दिसून येते. मात्र मावळमधील एक-दोन नव्हे तर तब्बल 71 शाळांमधील एकही विद्यार्थी शिष्यवृत्ती परिक्षेत पास झाला नाही. यामध्ये जिल्हा परिषदेच्या 11 शाळांमधील पाचवी आणि आठवीच्या वर्गशिक्षकांची एक वेतनवाढ रोखण्यात येणार असल्याचेही गटविकास अधिकारी सुधीर भागवत यांनी सांगितले.
नुकताच पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर झाला. मावळातील काही खासगी शाळांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. मात्र मावळ तालुक्यातील 11 जिल्हा परिषदेच्या शाळा आणि 60 खासगी शाळांचा निकाल शून्य टक्के लागला. याबाबत बोलताना गटविकास अधिकारी सुधीर भागवत म्हणाले की, ज्या शाळांचा निकाल शून्य टक्के लागला आहे, त्या शाळांमधील इयत्ता पाचवी आणि आठवीच्या वर्गशिक्षकांना नोटीस बजावण्यात येणार आहे. या नोटीशीचा खुलासा जर समाधानकारक आला नाही तर जिल्हा परिषदेच्या इयत्ता पाचवी आणि आठवीच्या वर्गशिक्षकांची एक वेतनवाढ रोखण्यात येणार आहे. याबाबत शिक्षण विभागाचे परिपत्रक आले असून त्या आधारे हा निर्णय घेण्यात येणार आहे. तसेच खासगी शाळेच्या शिक्षकांनाही नोटीस देऊन खुलासा मागविण्यात येणार आहे. त्यांचा खुलासा प्राप्त झाल्यानंतर संबंधित शैक्षणिक संस्थांना वर्ग शिक्षकांवर कारवाई करण्याबाबत सूचना देण्यात येणार आहेत. कारण खासगी शाळांवर कारवाई करण्याचे अधिकार आम्हाला नाहीत.
मावळ तालुक्यातील काही शाळांची तपासणी प्रशासनाने केली असता त्यामध्ये बहुतांश शाळांमधील विद्यार्थ्यांना लेखन, वाचन करता येत नसल्याची बाब निदर्शनास आली आहे. शिष्यवृत्ती परिक्षेत विद्यार्थी पास झाले असले तरी ते शिष्यवृत्तीस पात्र नाहीत. शून्य टक्के निकाल लागलेल्या 11 जिल्हा परिषद शाळांमधील मोहितेवाडी, टाकवे बुद्रुक, आंबी, खडकाळा या शाळांमध्ये आवश्यक त्या सुविधा असूनही शैक्षणिक दर्जा एवढा का खालावला, असा सवाल आता नागरिक करू लागले आहेत. याउलट दुर्गम भागात असलेल्या लोहगड, उकसाना पुनर्वसन या शाळांचा निकाल 100 टक्के तर कोंडीवडे शाळेचा निकाल 88.89 टक्के लागला आहे.
गुणवत्तेत सुधारणा पण…
गेल्यावर्षी जिल्हा परिषदेच्या 65 शाळांचा निकाल शून्य टक्के लागला होता. यंदाच्या वर्षी 11 शाळांचा निकाल शून्य टक्के लागला आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शैक्षणिक दर्जा जरी सुधारला असला तरी जिल्हा परिषद शाळांमधील एकाही विद्यार्थ्याला शिष्यवृत्ती मिळालेली नाही.