नवी दिल्ली, ता. 29 – “”आंतरराष्ट्रीय परिस्थितीत सुधारणा झाल्याची लक्षणे दिसत आहेत. गेल्या काही महिन्यातील घटना उत्साहदायक असून सर्व संहारक युद्ध टाळता येईल असे वाटू लागले आहे,” असे उद्गार पं. नेहरूंनी येथे बोलताना काढले. गुरूनानक जयंतीनिमित्त झालेल्या समारंभात ते भाषण करीत होते. गुरू नानक यांचा प्रेमाचा आणि विश्वबंधुत्वाचा संदेश फक्त शीख जमातीसाठीच नव्हे तर सबंध मानवजातीपुढील प्रश्न सोडविण्यासाठी उपयुक्त आहे, असे सांगून पं. नेहरू म्हणाले की, बड्या राष्ट्रांनाही आता युद्धामुळे सर्वनाश होईल असे वाटू लागले असून शांततावादी शक्तीचा त्यांचेवर प्रभाव पडत आहे. त्यामुळे ते गुण्यागोविंदाने एकत्र राहण्याचा मार्ग शोधू लागले आहे.
जीवनमान उंचावणे हाच प्रश्न
भारताने आपल्या शांततेच्या धोरणाने जागतिक राजकारणात प्रतिष्ठा कशी प्राप्त करून घेतली हे सांगून अंतर्गत प्रश्नाकडे वळून पंडितजी म्हणाले की, भारतातील पस्तीस कोटी जनतेचे राहणीमान कसे वाढवावे हाच भारतापुढील सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. पहिल्या पंचवार्षिक योजनेची अंमलबजावणी होत आली असून, दुसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या उंबरठ्यावर आपण उभे आहोत. या काळात आपण बरेच सुस्थिर झालो आहोत. इतर देशांच्या मानाने आपली प्रगती चांगली आहे.
प्राणाचे मोल देऊन अपघात टाळला
इंदुर – स्वतःच्या प्राणाचे मोल देऊन अपघात टाळणाऱ्या कर्तव्यदक्ष अंबालालच्या पुण्यस्मृतीस आज प. विभाग रेल्वे मजदूर संघातर्फे घेतलेल्या सभेत श्रद्धांजली वाहण्यात आली. नोव्हेंबर महिन्याच्या 22 तारखेची गोष्ट आहे ही! त्या दिवशी रतलम स्टेशन जवळ एक गाडी रुळावरून घसरली होती. घसरलेले डबे उचलण्याचे काम सुरू होते. एवढ्यात त्याच रूळावरून मुंबई एक्सप्रेस ही गाडी धावत येत असल्याचे अंबालाल याला दिसली. लागलेच अंबालाल रूळावरून हाताचा सिग्नल करून धावला. गाडी थांबवा म्हणून तो तोंडाने ओरडत होता. गाडी थांबली. अपघातही टळला पण हे सर्व त्याच्या अंगावरून गाडी गेल्यानंतर झाले.