पुणे – गारव्यामुळे मोसंबी, संत्री, कलिंगड, खरबूज, सीताफळ आदी थंड आणि रसदार फळांना मागणी घटली आहे. त्यामुळे गेल्या आठवड्याच्या तुलनेत कलिंगडांच्या भावात किलोमागे 3 ते 8 रुपये तर सीताफळाच्या भावात दहा ते वीस टक्क्यांनी घसरण झाली. पर्यटनासाठी येणाऱ्यांची रोडावलेली संख्या तसेच बंद असलेल्या शाळांचा परिणाम बोरांच्या मागणीवर झाला आहे. मागणीअभावी बोरांचे भाव दहा ते वीस टक्क्यांनी उतरले आहेत.
बाजारात दाखल होत असलेल्या मालाच्या तुलनेत मागणी वाढल्याने पपईच्या भावात किलोमागे दोन रुपयांनी वाढ झाली आहे. मागणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे उर्वरित फळांचे भाव टिकून आहेत. थंडीस सुरवात झाली असून करोनाचा प्रादुुर्भाव अद्याप कायम आहे. थंड फळे खाल्लयानंतर सर्दी होईल या भीतीने फळांना मागणी कमी झाल्याचे निरीक्षण व्यापारी वर्गाकडून नोंदविण्यात आले.
रविवारी येथील बाजारात केरळ येथून अननस 3 ट्रक, मोसंबी 50 ते 60 टन, संत्री 25 ते 30 टन, डाळिंब 30 ते 35 टन, पपई 10 ते 15 टेम्पो, लिंबे तीन ते साडे तीन हजार गोणी, पेरू 1 हजार क्रेटस्, चिकू 1 हजार बॉक्स, कलिंगड 7 ते 8 टेम्पो, बोरे 1 हजार ते 1200 गोणी, तर खरबुजाची 8 ते 10 टेम्पो आवक झाली.
फळांचे भाव पुढीलप्रमाणे :
लिंबे (प्रति गोणी) : 70-130, अननस (डझन) : 70-270, मोसंबी : (3 डझन) : 220-480, (4 डझन ) : 80-180, संत्रा : (10 किलो) : 100-400, डाळींब (प्रति किलोस) : भगवा : 50-200, गणेश : 10-30, आरक्ता 20-60. कलिंगड : 8-14, खरबूज : 15-25, पपई : 5-12, चिकू : 100-500, पेरू : 100-300, बोरे (10 किलो) चमेली : 50-90, उमराण : 30-35, चेकनट : 300-350, चण्यामण्या 400-450.