नवी दिल्ली :- आशियाई क्रीडा स्पर्धेत यंदा भारताचे तब्बल 634 खेळाडू सहभागी होणार असून विविध क्रीडा प्रकारात आपले कसब सिद्ध करत पदक मिळवण्यासाठी सज्ज बनले आहेत. केंद्रिय क्रीडा मंत्रालयाने 634 भारतीय खेळाडूंच्या नावांना मान्यता दिली आहे.
या स्पर्धेत भारतीय खेळाडू 38 क्रीडा प्रकारात सहभागी होत असून ही स्पर्धा 23 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर या कालावधीत चीनमधील हांगझोऊ येथे होणार आहेत. यापूर्वी 2018 साली जकार्तामध्ये ही स्पर्धा घेण्यात आली होती व त्यावेळी भारताच्या 572 खेळाडूंनी सहभाग घेतला होता.
यंदाच्या स्पर्धेत ट्रॅक आणि फील्ड स्पर्धेत 65 खेळाडू सहभागी होणार असून त्यात 34 पुरूष आणि 31 महिलांचा समावेश आहे. फुटबॉल संघात एकूण 44 खेळाडू असून त्यात पुरूष संघात 22 आणि महिला संघात 22 खेळाडू आहेत. पुरुष आणि महिला हॉकी संघात प्रत्येकी 18 खेळाडूंची निवड करण्यात आली.
भारताच्या पुरूष आणि महिला क्रिकेट संघात प्रत्येकी 15 खेळाडूंचा समावेश करण्यात आला. शूटिंगमध्ये 30 आणि रोइंगमध्ये 33 खेळाडूंना स्थान दिले आहे.
काही खेळांमध्ये पुरुष खेळाडूंना संधी नाही…
क्रिडा मंत्रालयाने वेटलिफ्टिंग, जिम्नॅस्टिक्स, हॅंडबॉल तसेच रग्बी या क्रीडा प्रकारांसाठी कोणत्याही पुरुष खेळाडूची निवड झालेली नाही. त्यातच मार्शल आर्टस आणि वेटलिफ्टिंगमध्ये दोन महिला खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. तर, जिम्नॅस्टिक्समध्ये केवळ एका महिला खेळाडूला स्थान देण्यात आले आहे.