पुणे – आशियाई कबड्डी स्पर्धेत सुवर्णपदक मिळविल्याचा आनंद आहेच. पण कबड्डी परदेशातही चांगलीच प्रगती करत आहे, अशी प्रतिक्रिया सुवर्णपदक विजेत्या भारतीय संघातील खेळाडू स्नेहल शिंदे हिने व्यक्त केली.
आशियाई स्पर्धेतील सुवर्णयशानंतर स्नेहल पुण्यात परतली.त्यानंतर गुरुवारी सकाळी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतल्यानंतर मंदिरापासून स्नेहलच्या माहेरच्या घरापर्यंत ओपन जीपमधून स्नेहलची मिरवणूक काढण्यात आली व तीचा गौरव करण्यात आला.
या मिरवणूकीला पुणेकरांनी उस्फूर्त दाद दिली. पुणेकरांनी रस्त्यात थांबून स्नेहलचे स्वागत केले. विशेष म्हणजे शाळेत जाणारे आणि सकाळी शाळा सुटून घरी जाणाऱ्या मुलांनीही भारत माता की जय अशा घोषणा देत स्नेहलचे कौतुक केले. संपूर्ण मिरवणूकीत नवरा सागर साखरे, सासू स्वाती साखरे, मामा अजय चिंचवडे, किरणी पाटील, भाऊ निखिल शिंदे, वडिल प्रदीप शिंदे, आई सुरेखा शिंगे, पूनम शिंदे, भाऊ पृथ्वीराज चिंचवडे, केश पाटील, अजय शिंदे असे सर्व कुटुंबिय उपस्थित होते.
खडक लाईन येथे मिरवणूक संपल्यानंतर स्नेहलशी संवाद साधला असता, तिने आशियाई स्पर्धेत भारताकडून खेळण्याचे स्वप्न बाळगले होते. इंडोनेशियात ते पूर्ण होऊ शकले नाही, पण या वेळी ते साकार झाल्यावर सुवर्णपदक घेऊनच मायदेशी यायचे ही खूणगाठ मनाशी बांधली होती. ती इच्छा पूर्ण झाली. आम्ही सुवर्णपदक मिळविले खूप आनंद वाटला. देशाच्या राष्ट्रगीताची धून वाजण्यात आपण कारणीभूत ठरलो याचा विजयमंचावर उभे राहिल्यावर अभिमान वाटला, असे स्नेहल म्हणाली.
कबड्डीत खरे तर भारताला आव्हान नाही इतकी आपली मक्तेदारी होती ती परत मिळवायला आवडेल. पण, आधी इराण आणि आता तैवान संघ पूर्ण तयारीने उतरले होते. त्यांची तयारी चांगली होती. त्यामुळे सुवर्णपदकाबरोबर कबड्डी परदेशात चांगली प्रगती करत असल्याचे पाहून आनंद द्विगुणित झाला, असेही स्नेहलने सांगितले.