नवी दिल्ली – एकीकडे देशात जी-20 परिषदेचे राजधानी दिल्लीत आयोजन होत असताना, दुसरीकडे कॉंग्रेस आता मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या निवडणूक राज्यांवर आपले पूर्ण लक्ष केंद्रित करत आहे. या राज्यांतील निवडणूक प्रचाराची संपूर्ण ब्ल्यू प्रिंट पक्षाने तयार केली आहे. कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे तेलंगणासह या तिन्ही राज्यांना भेट देणार आहेत. पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका वड्रा मध्य प्रदेश आणि खासदार राहुल गांधी राजस्थान-छत्तीसगडसाठी प्रचाराची धुरा सांभाळणार आहेत.
प्रियंका वड्रा मध्य प्रदेशात सुमारे 40 जाहीर सभा आणि रॅली घेणार आहेत. त्यांच्या दररोज दोन ते तीन रॅली होतील. निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर त्या दर दुसऱ्या दिवशी राज्यात निवडणूक दौरे करताना दिसतील. अनेकवेळा राहुल गांधीही प्रियंकासोबत येणार आहेत. मात्र मध्य प्रदेशातील प्रचाराच्या रणनीतीला प्रियांकाच अंतिम स्वरूप देतील. शिवाय छत्तीसगडमध्येही त्या सभा घेणार आहेत.
कॉंग्रेस पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे पाचही राज्यात प्रचार करणार आहेत. ते तेलंगणावर सर्वाधिक लक्ष केंद्रित करणार आहेत. राहुल राजस्थान आणि तेलंगणाच्या प्रचाराचे नेतृत्व करणार आहेत. प्रियंका काही सभा राजस्थान आणि तेलंगणामध्येही घेणार आहेत. राज्यांतील निवडणुकांची घोषणा होताच तिन्ही नेत्यांचे दौरे वेगाने सुरू होतील.
या नेत्यांच्या दौऱ्यांचे नियोजन अशा प्रकारे केले जात आहे की ते मतदानाच्या बळावर असलेल्या राज्यातील बहुतांश भागात आपले अस्तोत्त्व दाखवू शकतील. पक्षाच्या रणनीतीकारांनी अशी योजना तयार केली आहे की प्रत्येक नेता प्रत्येक दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी कमी-अधिक प्रमाणात राज्यांमध्ये प्रचार करेल. कोणत्याही राज्यात निवडणुका असल्या की राहुल गांधी आणि प्रियंका वड्रा हे दोघेही समान रस घेतात. प्रियंका हिमाचल आणि कर्नाटकमध्येही जास्त सक्रिय होत्या.
दरम्यान, निवडणूक आयोगाने अद्याप निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या नसल्या तरी त्याची तयारी युद्धपातळीवर सुरू आहे. नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये पाच राज्यांमध्ये निवडणुका होऊ शकतात, असे मानले जात आहे.
निवडणुकीच्या कामाशी संबंधित सूत्रांचे म्हणणे आहे की, मध्य प्रदेशमध्ये 6 जानेवारी आणि छत्तीसगडमध्ये 3 जानेवारीपूर्वी नवीन सरकार स्थापन करण्याचे घटनात्मक बंधन आहे. त्याचप्रमाणे 14 जानेवारीपूर्वी राजस्थानमध्ये नवीन सरकार स्थापन करणे आवश्यक आहे. या कारणास्तव निवडणूक आयोग ऑक्टोबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात पाच राज्यांतील निवडणुकीच्या तारखा जाहीर करू शकेल, असा अंदाज आहे.