जामखेड – विरोधक कुकडीच्या पाण्याचा मुद्दा घेऊन कर्जत-जामखेड तालुक्यात राजकारण करत आहेत. मग गेल्या पन्नास वर्षांत तुमच्याकडे सत्ता व जलसंपदामंत्रीपद असुनही कर्जत जामखेड तालुक्याला का पाणी दिले नाही? आणि आता काय पाणी देणार असा सवाल करून ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, देशात व राज्यात भाजपचे सरकार असून दोन्ही खासदार युतीचे, मग आमदार दुसरा कशाला? येत्या 24 ऑक्टोबरला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे घड्याळ दहा वाजून दहा मिनिटांनी कायमस्वरुपी बंद पडेल,असा विश्वासही त्यांनी येथे व्यक्त केला.
कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार प्रा. राम शिंदे यांच्या प्रचारार्थ ना. मुंडे यांनी जामखेड शहरातील बाजारतळ येथे सभा घेतली. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी उमेदवार प्रा. राम शिंदे, खासदार डॉ सुजय विखे, खासदार सदाशिव लोखंडे, शिवसेना उपनेते रमेश खाडे, जि प सदस्य सोमनाथ पाचरणे, जिल्हा बॅंकेचे संचालक जगन्नाथ राळेभात, सभापती गौतम उतेकर, सुभाष आव्हाड, माजी सभापती डॉ. भगवान मुरुमकर, माजी नगराध्यक्ष नामदेव राऊत, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे, भाजपचे तालुकाध्यक्ष रवी सुरवसे, कर्जत तालुकाध्यक्ष अशोक खेडकर, निखिल घायतडक, सचिन पोटरे, अजय काशीद, अमित चिंतामणी, मनोज कुलकर्णी, सरपंच प्रशांत शिंदे, ऍड. प्रविण सानप, अजिनाथ हजारे उपस्थित होते.
मुंडे म्हणाल्या, राज्यात पुन्हा महायुतीची एक हाती सत्ता येणार आहे. युती सरकारने मराठा आरक्षणाबरोबरच धनगर समाजाला न्याय देण्याचा निर्णय घेतला.
जातीपातीचे राजकारण न करता समाजातील प्रत्येक घटकाला विकासाच्या प्रवाहात आणण्याचे काम स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या प्रेरणेने सुरू आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे जलसंपदामंत्री खाते होते. तेव्हा कुकडीचे पाणी का दिले नाही आणि आता पाण्याची भाषा करता.सालगड्याचा मुलगा मंत्री व्हावा, हेच गोपीनाथ मुंडे यांचे स्वप्न होते. म्हणून राम शिंदे मंत्री झाले. यात चुकीचे काय आहे. त्यामुळे विरोधकांनी गरळ ओकायची आवश्यकता नाही. राज्यात येत्या 24 तारखेला 10 वाजून 10 मिनिटांनी राष्ट्रवादीचे घड्याळ कायमचे बंद पडणार आहे. केंद्रात कॉंग्रेस मुक्तीची घोषणा करण्यात आली होती. आता राज्यात राष्ट्रवादी मुक्तीची घोषणा करीत आहे. राष्ट्रवादी व कॉंग्रेसचा गलथान कारभार जनतेने पाहिला आहे. त्यांनी केवळ जातीपातीचे राजकारण केले. त्यांना विकासाचे काही देणे घेणे नाही. त्यामुळे त्यांच्या मागे जाऊ नका. ते बुडते जहाज आहे, असा टोला त्यांनी लगावला.
प्रा. शिंदे म्हणाले की स्व.लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी ज्यांना त्रास दिला. त्यांचा बदला घ्यायचा आहे. पन्नास वर्षांत तुम्ही कर्जत जामखेडला काय दिले, काहीच नाही आणि आता चॉकलेट, बिस्कीट वाटत फिरताय, आमची जनता दुधखुळी नाही. तुमचा नक्कीच मावळ पार्ट टु करणार आहे. व येत्या 24 तारखेला तुम्हाला चपला हातात घेऊन बारामतीला पळायला लावु असा टोला देखील रोहित पवार यांना लावला. मला पाच दिवस द्या, पुढील पाच वर्षे तुमचा सालकरी म्हणून काम करेल.