नगर -जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविलेल्या अहवालापैकी जामखेड येथील दोन, तर संगमनेर येथील चार व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे करोनाचा पुन्हा सिलसिला सुरू झाला असून, ती नगरकरांसाठी धोक्यांची घंटा मानली जात आहे.
जामखेड येथील काही दिवसांपूर्वी मृत्यूपावलेल्या रुग्णाची दोन्ही मुले करोनाबाधित झाली होती. त्यांच्या संपर्कात आलेल्या या दोन युवकांना आता करोनाची लागण झाल्याचे अहवालावरून स्पष्ट झाले आहे. तसेच संगमनेर येथील चौघांचे अहवाल करोनाबाधित आले आहे. त्यामुळे करोनाबाधित रुग्णांची संख्या आता 37 झाली आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील करोना मुक्त झालेल्यांची संख्या 20 झाली आहे. सध्या बूथ हॉस्पिटलमध्ये नऊ जण उपचार घेत आहेत, तर या बाधित दोन रुग्णांना आता तेथे हलवले जाणार आहे. जामखेड येथील एका व्यक्तीचा काही दिवसांपूर्वी जिल्हा सामान्य रुग्णालयात मृत्यू झाला होता. मात्र, त्याचा अहवाल आला नसल्याने त्याचा मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला नव्हता. त्या रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याच्या कुटुंबातील सर्वांचे घशातील स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात होते. त्यात त्याचे 29 आणि 35 वर्षीय मुलगे बाधीत असल्याचे आढळून आले. या मुलांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचे घशातील स्त्राव तपासणीसाठी पुण्याला पाठविण्यात आले होते. त्यात दोन व्यक्ती बाधित असल्याचे आढळून आले.
तसेच संगमनेर येथे रहेमतनगरमध्ये आढळलेल्या चौदा नेपाळी तबलिगींपैकी तब्बल चौघांना करोनाची बाधा झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. 31 मार्च रोजी रात्री उशिराने संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अभय परमार यांना शहरालगतच्या रहेमतनगर परिसरातील गल्ली क्रमांक दोनमध्ये काही विदेशी नागरिकांची माहिती मिळाल्यानंतर दुसऱ्या दिवशी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास त्यांनी पोलीस पथकासह तेथे छापा घातला. यावेळी पोलिसांना या इमारतीत चौदा तबलिगी जमातीचे नेपाळी नागरिक आढळून आले. त्या सर्वांची चौकशी केली असता, ते सर्वजण नेपाळच्या विविध भागांतील असल्याचे व गेल्या दोन महिन्यांपासून अधिक काळापासून भारतातच असल्याचे समोर आले. त्यांना संगमनेरच्या कुटीर रुग्णालयात नेण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप कचेरिया यांनी त्या सर्वांची तपासणी केली.
करोनाच्या संदर्भात प्रचलित असलेल्या कोणत्याही गोष्टी त्यांच्यात न आढळल्याने त्यांच्या हातावर होम क्वारंटाईन चे शिक्के मारुन त्यांना 2 एप्रिलपासून पुढील चौदा दिवसांसाठी विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. त्यांच्या विलगीकरणाचा कालावधी संपताच त्यांचे पुन्हा स्त्राव घेवून ते पुण्याच्या लष्करी वैद्यकीय प्रयोग शाळेत पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल आज (दि.23 ) रोजी प्रशासनाला प्राप्त झाला असून, या चौदा नेपाळी तबलिगी जमातीच्या नागरिकांपैकी त्यातील तब्बल चौघांना करोना विषाणूंची बाधा झाली आहे.