औरंगाबाद – महाराष्ट्र पोलीस दलात एकूण 12 हजार 200 पदांची भरती केली जाणार आहे. यात पहिल्या टप्प्यात 31 डिसेंबरपूर्वी 5200 पदांची भरती कुठल्याही परिस्थितीत करणार असून त्यानंतर 7 हजार पदे भरली जातील, अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.
दिलीप वळसे पाटील सध्या औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. यावेळी कायदा सुव्यवस्था परिस्थिती आणि गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण, गुन्हे सिद्ध होण्याचे प्रमाण याबाबत चर्चा करण्यात आली.
दिलीप वळसे पाटील म्हणाले, महाराष्ट्र पोलीस दलात डिसेंबरपूर्वी 5200 जागांवर भरती केली जाईल. तर, उर्वरित 7 हजार पदांची भरती नंतर करण्यात येईल. तसेच सर्वसामान्य माणसाला सौजन्याची वागणूक मिळाली पाहिजे. महिला आणि त्याबाबत घडणारे गुन्हे याबाबत आस्थेवाईकपणे निर्णय घेतले पाहिजे, अशा सूचना त्यांनी दिल्या.
याशिवाय आर्थिक गुन्हे आणि सायबर गुन्हे यांचे प्रमाण मोठे आहे. आर्थिक गुन्हे शाखा आणि सायबर शाखेने चांगले काम केले पाहिजे. सोशल मीडियातून महिलांची बदनामी केली जाते याकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे, असल्याचे त्यांनी सांगितले.