वसाहतवाद व वर्चस्ववाद नाहीसे झाल्याशिवाय चिरस्थायी शांतता नांदणे अशक्य
आल्जियर्स, ता. 8 – आल्जियर्स परिषदेने जो मुख्य प्रस्ताव ठरावरूपाने मांडण्याचे ठरविले आहे त्यात असे म्हटले आहे की, वसाहतवाद परराष्ट्रांवर वर्चस्व व दुसऱ्याचे प्रदेश व्यापणे, नवा वसाहतवाद, साम्राज्यवाद इत्यादी गोष्टी जोवर जगात चालू राहतील तोवर जगात चिरस्थायी शांतता कधीच नांदू शकणार नाही.
जगात श्रीमंत राष्ट्रे, गरीब राष्ट्रे असा भेद विद्यमान असता फक्त श्रीमंत राष्ट्रांच्या विभागात शांतता राखावयाची व इतर विभागांत अस्थिरता व परदास्य या गोष्टींना उत्तेजन देऊन हा श्रीमंत-गरीब भेद वाढीस लावणे धोकादायक ठरेल. त्यामुळे मोठ्या राष्ट्रांनी भांडत बसण्याचे कारण नाही. बडी राष्ट्रे, त्यांचे प्रश्न पाहून घेतील, बड्या राष्ट्रातील समझोता कायम राहील अशी अपेक्षा केल्यास ते वावगे होणार नाही.
भारतात सर्वत्र उद्योग व शेतीमधील उत्पादन वाढीवर भर देण्याची गरज
पुणे – उद्योग व शेती यात उत्पादनवाढ साधली तरच रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध होऊ शकतील व त्यामुळेच गरिबी दूर करता येईल, असे विचार मध्यवर्ती नियोजन खात्याचे राज्यमंत्री मोहन धारिया यांनी आज व्यक्त केले.
मोटारी व विमानांचे अस्तित्व उरणार नाही; मात्र पुढील शतकात हं!
नवी दिल्ली – एक प्रख्यात शास्त्रज्ञ म्हणाले, पुढील शतकाच्या मध्यास मोटार गाड्या व विमाने यांचे अस्तित्व राहणार नाही. कारण येत्या 60 ते 80 वर्षांत जगात पेट्रोलच शिल्लक उरणार नाही. सध्याचे पेट्रोल साठे आणखी सुमारे 31 वर्षे टिकतील. या शास्त्रज्ञाचे नाव डॉ. पोप असे असून तो ब्रिटनमधील ऍस्टन विद्यापीठाचा व्हाइसचॅन्सेलर आहे.