– अरुण गोखले
एक धागा सुखाचा, शंभर धागे दुःखाचे। जरतारी हे वस्र माणसा! तुझीया आयुष्याचे… महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मिकी अर्थातच ग. दि. माडगूळकर यांच्या मानवी जीवनवस्राचे यथार्थवर्णन करणाऱ्या या ओळी.
मनुष्यप्राणी हा जेव्हा आपले जीवनवस्र हे पांघरून जगात जन्माला येतो. त्यावेळी कोणाला ते वस्र कसे आणि किती काळासाठी पांघरायला मिळाले आहे, ते भरजरी आहे का फाटके तुटके आणि दीर्घ कालीन आहे का अल्पकालिन हे फक्त त्या जीवन नाट्याच्या वरच्या सूत्रधारालाच माहीत असते.
मानवी जीवन हे सुख दु:खाच्या धाग्यांनी विणलेले वस्र आहे. ते जरतारी म्हणजेच त्याच्या चांगल्या वाईट कर्मफळावर म्हणजेच जीवनात त्या जीवाच्या वाट्याला येणाऱ्या सुख दु:खावर ठरत असते. कोणी एखाद्या धनवानाकडे जन्मास येतो, तर कोणी दरिद्री नारायणाच्या झोपडीत. कोणी चांदीच्या वाटीतून दूध पितो तर कोणाला पाण्यात कालविलेले पीठही मिळत नाही.
बरं त्या जगनियत्याने त्या जीवाच्या जन्माबरोबरच त्यासाठी केलेल्या मातेच्या दुधाची सोयही कुणाला किती काळ मिळेल हे सांगता येत नाही. हे असं जरी असलं तरी जीव जगत असतो, कधी सुखाने आनंदून नाचत असतो.
तर कधी दु:खाने अश्रू ढाळत असतो. असं असलं तरी माणसाची जगण्याची इच्छा काही त्याला गप्प बसू देत नाही. जो तो आपले जीवनवस्र हे विविधरंगी रंगविण्याचा प्रयत्न करतच असतो.
ज्यांना जीवनवस्राचे मोल समजते, ते त्याला वेगवेगळ्या रंगांनी खुलविण्याचा प्रयत्न करतात. कोणी त्यावर कर्तृत्वाची कलाकुसर काढतात. कोणी त्याला त्यागाचा भगवा रंग चढवितात. कोणी ते वस्र निष्कलंक राखण्याचा प्रयत्न करतात.
तर कोणी ज्याने हे मानवी देहाचे वस्र घालून जीवास जगण्यासाठी जगात पाठविले ते भक्तीच्या रंगानेच ते वस्र पुरते रंगवून त्या विश्व नियत्याच्या चरणावरच समर्पित करतात. प्रत्येकानेच आपले जीवनवस्र हे निर्मळ राखायला हवे. त्यावर स्वार्थ, मोह, अहंकार, दांभिकता, याचे डाग पडणार नाहीत याची दक्षता घ्यायला हवी.
अंगावरच्या भरजरी वस्रातून आपल्या मनातील वृत्ती दारिद्य्र दिसणार नाही, याची काळजी जशी घ्यावी लागते. तसेच फाटक्या वस्रातील सहृदयतेचं माणुसकीचं, आपलेपणाचं दर्शन घडवण्यातच जीवनाची खरी सार्थकता असते हे विसरून चालत नाही. वस्रापेक्षाही त्यातल्या माणसातलं माणूसपण जपणं हेच खरं महत्त्वाचं आहे.