स्मगलरांना अटकेस आव्हान देता येणार नाही राष्ट्रपतींनी काढला नवा हुकूम
नवी दिल्ली, दि. 24 – चोरट्या व्यापाराबद्दल व परकीय चलनाच्या गैरव्यवहाराबद्दल अटक करण्यात आलेल्यांना या अटकेबद्दल कोर्टात दाद मागता येणार नाही, असा हुकूम राष्ट्रपतींनी काढला आहे. हा हुकूम सहा महिने जारी राहील. परंतु त्यापूर्वी आणीबाणी परिस्थिती संपली तर त्याचीही मुदत संपेल, असे जाहीर करण्यात आले आहे.
वर उल्लेखिलेल्या आरोपांवरून अटक झालेल्यांना जर अटकेस आव्हान देणारे अर्ज कोर्टात दाखल केले असतील, तर त्यांच्या सुनावणीचे कामही स्थगित ठेवण्यात यावे असे हुकुमात म्हटले आहे. 16 नोव्हेंबर रोजी अंतर्गत सुरक्षा कायद्याच्या बाबतीत जो हुकूम काढण्यात आला होता, त्याची जागा आता हा नवा हुकूम घेईल. पूर्वीचा वटहुकूम ज्या उद्देशाने काढण्यात आला होता, ते सफल होण्यास अडचणी येऊ नयेत हा नव्या हुकुमामागील हेतू.
पुण्यात “ग्राहक पंचायत’ स्थापन होणार
पुणे – युवक महामंडळाच्या ग्राहक चळवळीचे प्रातिनिधिक स्वरूप उभे करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला असून 24 जानेवारीस पुण्यात “ग्राहक पंचायती’ची स्थापना लोकनेते जयप्रकाश नारायण यांचेहस्ते होणार आहे. 25 कुटुंबांच्या ग्राहकसंस्थेचे अध्यक्ष या पंचायतीचे सभागृहात प्रतिनिधी म्हणून बसतील.
आज पुण्यात सुमारे 250 ग्राहक संघ असून त्यांचे प्रतिनिधी तसेच आगामी काळात सुरू होणाऱ्या ग्राहक संघाचे सुमारे 500 प्रतिनिधी या सभागृहात बसतील व मंडळाचा कारभार लोकहिताच्या दृष्टीने चालविण्यासाठी प्रयत्न करतील, असे बिंदुमाधव जोशी यांनी सांगितले.
तसेच सायंकाळी सारसबागेत युवक महामंडळाचा ग्राहक परिवार मेळावा भरला होता. त्यात सुधीर फडके यांचे गीतरामायण, व. पु. काळे यांचे कथाकथन, ग. दि. माडगूळकर व प्रा. वसंत कानेटकर यांच्या गप्पागोष्टी इ. कार्यक्रम झाले.