मुंबई : राज्यात वाढत जाणाऱ्या ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर विमानाने दुबईहून येणाऱ्या प्रवाशांवर कडक निर्बंध लावण्याचे पालिका प्रशासनाने ठरवले आहे. ओमायक्रॉनचे रुग्ण जास्त असलेल्या जोखमीच्या देशातून येणारे प्रवासी दुबईमार्गे आपला प्रवास करत असतात त्यामुळे दुबई विमानतळावर जगभरातील प्रवाशांचा संपर्क येत असतो. त्यामुळे दुबईहून येणाऱ्या प्रवाशांना सात दिवस गृह विलगीकरण सक्तीचे करण्यात आले आहे. ओमायक्रॉनच्या वाढत्या धोक्यामुळे मुंबईचे पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी नवीन नियमावली जाहीर केली आहे.
जगभरात गेल्या काही दिवसांपासून ओमायक्रॉन या करोनाच्या नवीन विषाणू प्रकाराचा संसर्ग वाढू लागला आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय प्रवाशांवर निर्बंध घालण्यासाठी राज्य सरकारने व पालिका प्रशासनाने नियमावली जाहीर केली आहे. त्यात आता खास दुबईहून येणाऱ्या प्रवाशांसाठी आणखी कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. ओमायक्रॉनचा धोका असलेल्या १२ देशांची यादी भारत सरकारने तयार केली आहे. त्या देशातून येणाऱ्या प्रवाशांवर आधीच निर्बंध आहेत.
मात्र असे आढळून आले आहे की या १२ देशातील प्रवासी अनेकदा दुबई मार्गे आपल्या पुढील प्रवासाला जात असतात. त्यामुळे दुबई विमानतळावर अनेक देशातील प्रवासी उतरतात व त्यांचा एकमेकांशी संपर्क होतो. त्यामुळे यापुढे दुबईतून येणाऱ्या प्रवाशांवरही पालिका प्रशासनाचे लक्ष असणार आहे. दुबईहून मुंबई विमानतळावर उतरून मग विमानाने अन्य राज्यात जाणाऱ्या प्रवाशांवर कोणतीही निर्बंध नसले तरी त्यांच्याशी विमानतळ प्राधिकरणाने समन्वय राखावा, असेही सांगण्यात आले आहे.
मुंबई पालिकेचे नवी नियमावली
* दुबईहून मुंबईत येणाऱ्या मुंबईकरांसाठी सात दिवसांचे गृह विलगीकरण सक्तीचे करण्यात आले आहे.
*विमानतळावर उतरल्यानंतर आरटीपीसीआर चाचणीची आवश्यकता राहणार नसली तरी पुढील सात दिवस त्यांच्याशी पालिकेच्या विभाग कार्यालयातील नियंत्रण कक्षामार्फत संपर्क ठेवला जाणार आहे. सातव्या दिवशी त्यांची आरटीपीसीआर चाचणी केली जाणार आहे.
* प्रवासी बाधित नसला तरी त्याला पुढील सात दिवस सतर्क राहावे लागणार आहे. मात्र प्रवासी बाधित आढळल्यास त्याला संस्थात्मक विलगीकरणात ठेवले जाणार आहे.
* दुबईहून मुंबई विमानतळावर उतरलेल्या पण महाराष्ट्राच्या अन्य भागात जाणाऱ्या प्रवाशांशी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत समन्वय साधला जाणार आहे.
* या प्रवाशांना सार्वजनिक परिवहन सेवा वापरता येणार नाही. या प्रवाशांची प्रवासाची सोय जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत केली जावी.