काळ कठिण आहे; लोकांनो धैर्याने तोंड द्या
लखनौ, दि. 17 – “देश एका कठिण आर्थिक परिस्थितीतून जात आहे. लोकांनी त्या परिस्थितीस धैर्याने तोंड दिले पाहिजे’, असे पंतप्रधान इंदिरा गांधी म्हणाल्या. येथून 15 किमी अंतरावर चीनहाट येथे गोमती प्रकल्पाचा पायाभरणी समारंभ गांधी यांच्या हस्ते झाला. त्या म्हणाल्या, केवळ पाटबंधारे काढून गरज भागणार नाही, उत्पादन वाढले पाहिजे.
फक्त भारतापुढेच आर्थिक पेचप्रसंग नाही. साऱ्या जगावर टंचाईची छाया पसरली आहे. जीवनाश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतीवर काय तोडगा काढावा या विषयी सरकार, अर्थतज्ज्ञ व इतरांशी सल्ला मसलत करीत आहे, असेही इंदिराजींनी सांगितले. हा प्रकल्प पूर्ण झाल्याने पाण्याचा प्रश्न सुटेल अशी आशा मुख्यमंत्री बहुगुणा यांनी व्यक्त केली.
वसंत व्याख्यानमाला शताब्दी महोत्सव
वसंत व्याख्यानमाला हे केवळ पुण्याचेच भूषण नाही ते महाराष्ट्राचे अभिमान स्थळ आहे. वसंत व्याख्यानमालेला 1974च्या मे महिन्यात शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने शताब्दी समारंभ साजरा होणार आहे. प्रारंभी स्थापन झालेल्या सार्वजनिक सभा, वक्तृत्वोत्तेक मंडळी यांच्या कार्यातूनच वसंत व्याख्यानमाला स्थापन झाली.
ज्ञान प्रसार आणि विचार जागृती करण्याच्या हेतूने स्थापन झालेल्या मालेच्या स्थापनेत न्या. रानडे यांचा पुढाकार होता. प्रारंभी मालेची वाटचाल मंदगतीने चालली होती. कधी आठ दिवस, कधी पंधरा दिवसच व्याख्याने होत. पण पुढे मालेने खूपच गती घेतली आणि व्याख्याने महिनाभर अखंडपणे होऊ लागली. आज विषयांत विविधता आली आणि श्रोतृवर्गातही मोठा बदल झाला