अरुण गोखले
पू. गोंदवलेकर महाराजांचे द्रष्टेपण हे त्यांच्या बोधातून व्यक्त होत असे. तुम्हा आम्हा प्रापंचिक जीवांना जागविणारा त्यांचा बोध असा की, “लोक काय म्हणतील?’ म्हणून तुम्ही जे वागता, जे करता तो प्रपंच आणि भगवंताला काय वाटेल याचा विचार करून तसे वर्तन करणे हा परमार्थ आहे.
खरंच साध्या शब्दातला किती महत्त्वाचा बोध आहे हा महाराजांचा! नाहीतरी आपण आपल्या संसार प्रपंच्यात नेहमी हेच तर करत असतो. लोक काय म्हणतील? म्हणून आपण अनेकदा आपली इच्छा नसली तरी तसं वागतो, त्यांच्या मताचा, शब्दाचा, भेटीचा आदर करतो.
त्यांच्यासाठी प्रसंगी आपण पदरमोड करतो. अनेक व्यवहार, देवघेव इतकेच नाहीतर अगदी साधे कपडेलत्तेही लोक काय म्हणतील म्हणून निवडत असतो. बदलत असतो. देणे-घेणं करीत असतो. लग्ना-मुंजीच्या आहेराची देवाण-घेवाण करताना तर त्याचा फारच विचार केला जातो. त्या लोकांसाठी, त्यांनी प्रशंसा करावी म्हणून तसे वागताना अनेकदा आपली दमछाक होते.
चार लोकांत आपली प्रतिष्ठा, मोठेपणा सांभाळण्याचा तो प्रयत्न असतो. आपल्या कुटुंबीयांचा विचार करताना त्यांना काय वाटेल, ते काय म्हणतील, याचा विचार करत असताना मला काय वाटतं, मला काय करायचं आहे, माझी काय आवड आहे, याचा विचारही आपण करत नाही. हे मन मारण्याची महिलांना तर जास्तच सवय असते.
महाराजांचे हेच सांगणे आहे की, बाबांनो! तुम्हा या व्यवहारातल्या लोक काय म्हणतील याचा जसा आणि जितका मनापासून विचार करता तसा भगवंत काय म्हणेल याचा विचार करा. तो जर करत नसाल तर करायला हवा. कारण बहुभाग्याने जीवाला हा नर देह लाभत असतो. मनुष्य जन्म ही खरं तर त्या ईश्वराने आपल्याला दिलेली एक सुवर्णसंधी आहे.
त्यासाठी त्याने आपल्याला देहरूपी एक उतम साधनही दिले आहे. आपल्याला मातेच्या पोटात वाढविणाऱ्याची आठवण ठेवणे. तोच आपल्या हृदयात आत्माराम रूपाने वसलेला आहे हे ओळखणे, त्याच्याशी जवळीक साधण्यासाठी त्याच्या नामाची कास धरणे,
त्याच्या अनुसंधानात राहणे याचा अर्थ देवाला काय वाटेल याचा विचार करून तसे आचरण करण्याचा प्रयत्न करणे होय. ही असोनि संसारी परमार्थाची आणि प्रपंच्याची सद्गुरू बोधाने सांगड घालणे गरजेचे आहे, हे विसरून चालणार नाही.