शिवचरित्र तत्त्व म्हणून न बघता आत्मा म्हणून बघा
पुणे, दि. 27 – तरुण मनाने ताठ मानेने कसे जगावे आणि मृत्यूशी झुंज कशी द्यावी हा बोध शिवचरित्रातून आपणास मिळेल. म्हणूनच शिवचरित्राला तत्त्व म्हणून न बघता आत्मा म्हणून बघा, असे उद्गार मृत्यूंजय कादंबरीचे प्रसिद्ध लेखक शिवाजीराव सावंत यांनी काढले.
मृत्यू फक्त शरीराचा
शिवाजी महाराजांनी आपले राज्य संकटाला तोंड देऊन कसे वाढवले आणि त्यांना कशा प्रकारे त्रास सहन करावा लागला हे पाहिले पाहिजे. आणि त्याप्रमाणे आजही आपण जीवनातील प्रत्येक संकटाला तोंड द्यायला शिकले पाहिजे. माणसाची मने मरत नसून शरीरे फक्त मातीत जातात हे विसरता येणार नाही.
मानवी मनाची स्पंदने कथेतूनच बाहेर पडतात
बीड – जीवनवादी, कलावादी आणि संवेदनातून निर्माण होणारी स्पंदने मानवी मनातून कथेद्वारे बाहेर पडली जातात. त्यातच नव्या लेखकाचा हेतू असतो, असे विचार लेखक प्रा. आनंद यादव यांनी व्यक्त केले.
नैतिक ते अनैतिक
जुन्या साहित्यात जुने प्रसंग, प्रेरणा, कार्य यावरच कथाकार, कवी यांनी भर दिला. मात्र नव्या साहित्यात, समाजात होणारे निरनिराळे बदल यावर भर दिला गेला. हीच जुन्या आणि नव्या कथा, कवितेतील तफावत आपणाला दिसून येते. समाजात नीतीच्या, चांगुलपणाच्या कल्पना असतात, चांगले जगता यावे म्हणून कथेतून नैतिक विचार व्यक्त केले जातात.