संग्रामगड (उत्तर प्रदेश) – उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी मतदान सुरू असताना, रामपूर खास येथील कॉंग्रेस पक्षाच्या उमेदवार आराधना मिश्रा यांनी संग्रामगड येथील मतदान केंद्रावर मतदान केले.
मतदान केल्यानंतर एका वृत्तसंस्थेशी बोलताना मिश्रा यांनी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस पक्षच विजयी होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे. त्या म्हणाल्या की कॉंग्रेसने लोकांचे नेमके प्रश्न घेऊन ही निवडणूक लढवली. त्यामुळे यंदा उत्तर प्रदेशचे लोक कॉंग्रेसवर विश्वास दाखवतील. आराधना मिश्रा या विधिमंडळ कॉंग्रेस पक्षाच्या नेत्या आहेत. त्यांच्या विरोधात भाजपने येथून नागेंद्र प्रताप सिंह यांना उमेदवारी दिली आहे.
कॉंग्रेसने 2017 च्या विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्षासोबत युती करून 403 पैकी 114 जागा लढवल्या होत्या. एकूण मतांपैकी 6.25 टक्के मते मिळवून कॉंग्रेसने केवळ सात जागा जिंकल्या होत्या.
त्या विजयी उमेदवारात आराधना मिश्रा या होत्या. 2012 मध्ये कॉंग्रेसने 355 जागांपैकी 28 जागा जिंकल्या होत्या, त्यावेळी एकूण मतांपैकी 11.65 टक्के मते कॉंग्रेसने मिळवली होती.