नवी दिल्ली – कोणत्याही परिस्थितीत भारत आपला 156 कोटी रुपयांचा फराक्का धरण प्रकल्प सोडून देणार नाही, असे आज लोकसभेत परराष्ट्रमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी ठामपणे सांगितले.
गंगा नदीच्या पाण्याच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी वाटाघाटींना प्रतिनिधी पाठवावेत, असे आमंत्रण भारताने बांगलादेश सरकारला 11 फेब्रुवारी 1976 रोजी पाठविलेले आहे. हे आंमत्रण बांगलादेश सरकारने स्वीकारलेले नाही वा नाकारलेही नाही. कोणतीही अट न घालता या प्रश्नावर वाटाघाटी करून तो सोडविणे, हेच भारत व बांगलादेश दोघांच्याही हिताचे आहे.
श्रीलंकेतून 1.94 लक्ष भारतीय परतले
नवी दिल्ली – भारत आणि श्रीलंका यांच्यात झालेल्या करारानुसार गेल्या फेब्रुवारी अखेरपर्यंत श्रीलंकेतून मूळ भारतीय असलेले 1.94 लक्ष लोक भारतात आलेले आहेत. सन 1981 पर्यंतच्या 17 वर्षातील काळात सुमारे 6 लक्ष आणि त्याहून थोडेसे अधिक लोक भारतात येणार आहेत.
वेठबिगारी माहिती देणाऱ्यास बक्षीस
नवी दिल्ली – आंध्र प्रदेश सरकारने त्या राज्यातील वेठबिगारी संबंधाची माहिती पुरविणाऱ्या इसमास प्रोत्साहनपर बक्षिस देण्याचे ठरविले आहे. माहिती देणाऱ्या इसमास 100 रुपयांपर्यंत बक्षीस मिळेल.