पिंपरी – शहरात गेल्या काही दिवसांपासून सर्दी, ताप, खोकला आणि घशाचा त्रास होणाऱ्या रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामध्ये दोन ते तीन दिवसांनी ताप कमी झाला तरी खोकला आणि कफ काही पाठ सोडेना. त्यामुळे सर्दी आणि खोकल्याला पिंपरी-चिंचवडकर वैतागले आहेत. पालिकेच्या वायसीएम रूग्णालयातील ओपीडी दीड हजाराहून दोन हजारांवर गेली आहे. तसेच शहरातील इतरही दवाखान्यांबाहेर लहानांपासून मोठ्यांपर्यंतच्या रूग्णांची गर्दी दिसून येत आहे.
शहरात गेल्या काही दिवसांपासून सर्दी, खोकल्याचे रूग्ण वाढले आहे. वायसीएम रूग्णालयात दररोज दीड हजार ओपीडी होती. ती आता दोन हजारच्या आसपास गेली आहे. त्यामुळे नागरिकांनी आपली प्रतिकार शक्ती चांगली ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत. यामध्ये समतोल आहार घ्यावा, पालेभाज्यांचा आहारात समावेश करावा, भरपूर पाणी घ्यावे. तसेच लहान मुलांची प्रतिकारशक्ती कमी असल्यामुळे त्यांना या विषाणुची लागण लगेच होते. त्यामुळे पालकांनी घाबरून न जाता लक्षणे दिसल्यास डॉक्टरांच्या सल्लयाने औषधोपचार करावे.
– डॉ. राजेंद्र वाबळे, अधिष्ठाता, वायसीएम रूग्णालय
गेल्या काही दिवसांपासून वातावरणात सतत होणारे बदल कधी पाऊस, कधी थंडी तर कधी उन्हाचा खेळ यामुळे विषाणुला पोषक वातावरण तयार झाले आहे. शहरासह राज्यात इन्फ्लुएन्झा ए या विषाणुचा उपप्रकार असलेल्या एच-3 एन-2 चा झपाट्याने प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे खोकला आणि तापाचे रूग्ण वाढत वाढत असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात येत आहे. घरात एकाला ताप, सर्दी, खोकला लक्षणे दिसून आल्यावर टप्प्याटप्याने त्या घरात लोक आजारी पडत आहे. त्यात खोकला जास्त दिवस राहत असल्याने नागरिक सर्दी, खोकल्याला कंटाळले आहेत. सर्वसाधारणपणे थंडी आणि पावसाळ्यात इन्फ्लुएंझा विषाणू आढळून येतो. या इन्फ्लुएनझा विषाणूचे ए, बी आणि सी असे तीन प्रकार आहेत. त्यापैकी इन्फ्लुएंझा ए या विषाणूच्या प्रकारामुळे खोकला आणि ताप येत असतो. हा एका विशिष्ट हंगामात दिसणारा विषाणू आहे. या आजाराला घाबरण्याची गरज नसली तरी लक्षणे दिसल्यावर त्वरीत उपचार घ्यावेत, असे आवाहन डॉक्टरांनी केले.
“या” पंचसुत्रीचे पालन करावे
घराबाहेर पडताना नाका – तोंडाला मास्क लावा
पाणी जास्त प्यावे
सकस आहार घ्यावा
पालेभाज्यांचा आहारात समावेश करा
कोमट पाण्याने गुळण्या कराव्या