पिंपरी -पिंपरी-चिंचवड शहराला सव्वा तीन वर्षांपासून दिवसाआड पाणी पुरवठा सुरू आहे. त्यामुळे दुर्गानगर, पाटील नगर, शेलार वस्ती, चिखली गावठाणासह चिखलीमधील सर्व रहिवासी सोसायट्यांना पाण्याची समस्या भेडसावत आहेत. आताशी उन्हाळा सुरू होण्याची चिन्हे असतानाच चिखली भागात पाणी प्रश्न गंभीर झाला असून याविरोधात विकासभाऊ साने सोशल फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विकास साने यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेवर हंडा मोर्चा काढण्यात आला.
या मोर्चामध्ये महिलांचा मोठा सहभाग होता. विकास साने यांनी पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता रामनाथ टकले यांना निवेदन दिले. तसेच चिखली भागातील पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही दिला आहे.
याबाबत विकास साने म्हणाले, दुर्गानगर, पाटीलनगर, शेलार वस्ती, चिखली गावठाणासह चिखली मधील सर्व रहिवासी सोसायट्यांचा पाणीप्रश्न अतिशय बिकट होत आहे. शहराला सव्वा तीन वर्षांपासून दिवसाआड पाणी पुरवठा सुरू आहे. असे असताना चिखली परिसरात अपुरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे.
उन्हाळा तीव्र झाल्यास पाण्याचा प्रश्न आणखी बिकट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने तत्काळ याची गंभीर दखल घ्यावी. तसेच पाणीपुरवठा विभागात चिखली भागात 10 ते 15 वर्षांपासून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची बदली केली आहे. नवीन कर्मचाऱ्यांच्यामध्ये समन्वयाचा अभाव दिसून येत आहे. याचा पाणी पुरवठ्यावही परिणाम होत आहे. नागरिकांचा पाणी प्रश्न तत्काळ सोडवावा, अशी मागणी विकास यांनी केली आहे.