निवडणूक प्रचारासाठी 23 कलमी आचारसंहिता
नवी दिल्ली, दि. 5 – राजकीय पक्ष व उमेदवार यांनी येत्या निवडणुकांच्या संदर्भात पाळावयाची 23 कलमी आचारसंहिता निवडणूक आयोगाने जाहीर केली. दुसऱ्या राजकीय पक्षावर टीका करताना ती त्या पक्षाच्या फक्त धोरणांवर, कार्यक्रमांवर, पूर्वीच्या कामावर असावी; खासगी जीवनावर नको.
दुसऱ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी लावलेली पोस्टर्स काढून टाकू नयेत. परस्परातील भेद अधिक चिघळतील, द्वेष निर्माण होईल, असा प्रचार टाळण्याची त्यात सूचना देण्यात आली आहे.
सरकार हिंसाचार खपवून घेणार नाही
नवी दिल्ली – देशाच्या अखंडत्वास धोका पोहोचविण्याचे प्रयत्न वा हिंसाचार खपवून न घेण्याचा सरकारचा निर्धार आहे, असे पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी जाहीर केले. लोकशाहीवर आपला पूर्ण विश्वास असल्याचा पुनरुच्चार करून गांधी म्हणाल्या, लोकांनी आपला मूलभूत हक्क बजवावा, सर्व प्रश्न जनतेपुढे ठेवलेच पाहिजेत, असे मला वाटते.
म्हणूनच मी निवडणुकांचा निर्णय जाहीर केला. निवडणुका कोणत्याही व्यक्तीसाठी वा पक्षासाठी नसतात. तो देशाच्या भवितव्याचा प्रश्न असतो.