महुडे – भोर तालुक्यातील भाटघर जलाशयाच्या किनारी असलेल्या सकल मराठा समाज ४० वेळवंड खोरे यांच्यावतीने मराठा समाजाचा सरसकट ओबीसी प्रवर्गात समावेश करुन मराठा आरक्षण देण्यात यावे, या मागणीच्या व मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ मराठा समाजाच्या वतीने सोमवार (ता.३०) पासून साखळी उपोषणास सुरुवात करण्यात आली आहे. मराठा समाज आरक्षणासाठी एकवटला आहे.
हे उपोषण २ नोव्हेंबर पर्यंत सुरु राहणार असून दररोज सकाळी १० ते सायं.६ पर्यंत मध्यवर्ती ठिकाण असलेल्या वाढेश्वर मंदिर वेळवंड येथे सुरु राहणार आहे. या साखळी उपोषणात मळे, भुतोंडे खोरे, वेळवंड खोर्यातील ४० गावातील मराठा बांधव सहभागी होणार आहेत. सोमवार ता. ३० रोजी परिसरातील ग्रामस्थांच्या उपस्थित श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या साखळी उपोषणाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी भागातील मराठा बांधवांनी आपले विचार व्यक्त करत मराठा आरक्षणाच्या उपोषणाला पाठींबा जाहीर केला.
जर चार दिवसात मराठा आरक्षण मिळाले नाही तर ४० गावच्या मराठा समाजाच्या वतीने भाटघर धरणाच्या जलाशयात खाजगी चार असलेल्या होड्यात बसून अमरण उपोषण करण्यात येणार असल्याचे आंदोलकांनी सांगितले. यावेळी भागातील बांधव, भगिनी, युवक व शाळकरी मुले मुलीही उपस्थित होत्या.
मराठा आरक्षण व जरांडे पाटील यांच्या उपोषणाच्या समर्थनास या साखळी आंदोलन काळात भागातील सर्व ग्रामपंचायतींचे ठराव घेण्यात येणार आहेत. तसेच जो पर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत राजकीय नेत्यांना गाव बंदी घालून आगामी होणाऱ्या निवडणूक मतदानावर बहिष्कार टाकण्यात येणार असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.
साखळी उपोषण सुरू होण्यापूर्वी उपोषणात सहभागी होण्यासाठी भागातील गावात बैठका घेण्यात आल्या होत्या. तर धरणाच्या पलीकडील मळे डेरे व इतर गावातील नागरिकांना वेळवंड येथे साखळी उपोषणास ये-जा करण्यासाठी मोफत होडीची सोय करण्यात आली आहे.