वाघोली – पुणे जिल्ह्यात आणखी एक नवीन महापालिका स्थापन करण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिले आहेत. त्यामुळे पूर्व हवेलीतील विशेषत: वाघोली पूर्व भागातील 38 गावांचा नवीन महापालिकेत समावेश होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे पूर्व हवेलीतील वेशीबाहेर असलेली ही गावे नवीन महापालिकेचा उंबरठा
ओलांडणार आहेत.
शहरालगतची गावे पालिकेच्या कवेत येणार असली तरी येथील गावांतील समस्या आणि त्यादृष्टीने प्रशासकीय उपाययोजना करण्याबाबत सत्ताधारी नेत्यांसमोर आव्हानेच उभी आहेत. त्यामुळे नवीन महापालिकेच्या घोषणेपूर्वीच वाघोली पूर्व भागातील गावांत वातावरण चांगलेच तापले आहे. अजित पवार यांच्या आश्वासनानंतर हडपसर महापालिकेची निर्मिती ऐरणीवर आली आहे.
पुणे महापालिका ही 2000 पर्यंत मर्यादित होती. 2002 मध्ये पुण्यात आयटी क्षेत्र सुरू झाल्यानंतर पुणे शहराचा झपाट्याने कायापालट झाला. त्यात माहिती आणि सेवा, बांधकाम, पर्यटन, हॉटेल उद्योग, बहुराष्ट्रीय कंपन्या आदींचे प्रचंड जाळे पुणे, पिंपरी- चिंचवड शहरात विस्तारले. पुणे शहरातील आयटी पार्कमुळे पूर्व हवेली, मुळशी, शिरूर तालुक्यातील पुण्यालगतची गावे झपाट्याने विकसित झाली. तसेच नागरिकीकरणाचा आवाका या गावांमध्ये वाढला. वाघोली, लोणीकाळभोर, मांजरी, लोणीकंद, उरूळी कांचन परिसरातील गावांमध्ये बांधकाम क्षेत्र, शैक्षणिक संस्थांचा पसारा वाढला. त्यामुळे ही गावे शहरालगतच येऊन टेकली आहेत.
पुणे महापालिकेत अकरा गावांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच शहरालगतची गावे पीएमआरडीएच्या कक्षेत येत आहेत. मात्र, येथील गावांत अपेक्षित विकासकामांची गती आली नसल्यामुळे समाजाभिमुख कामांना एकप्रकारे खीळ बसली आहे. वाघोली हा परिसर पुणे शहरालगत आहे. येथील वाहतूक कोंडीचा प्रश्न, सांडपाणी, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, सर्वाधिक चर्चेत असलेला कचरा समस्या ज्वलंत बनली आहे.
पुणे महापालिकेवर शहरालगतच्या गावांचा अतिरिक्त ताण पडत असल्यामुळे विकासकामे करण्यासाठी मर्यादा येत आहेत. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत ही माहिती दिल्यामुळे नवीन हडपसर महापालिकेच्या स्थापनेला धुमारे फुटले आहेत.
समावेशासाठी ही गावे लक्षवेधी
पुणे महापालिकेवर गावांचा भार पडत असल्यामुळे आता हडपसर महापालिकेची चर्चा ऐरणीवर आली आहे. त्यामुळे पूर्व हवेलीतील वाघोली, वाडेबोल्हाई, उरूळी कांचन, लोणी काळभोर, केसनंद, आव्हाळवाडी, भावडी, शिरसवाडी, बिवरी, अष्टापूर, हिंगणगाव, पेरणे, न्हावी सांडस, पिंपरी सांडस, सांगवी सांडस, लोणीकंद, तुळापूर आदी गावांसह 38 गावांचा समावेश नवीन महापालिकेत होण्याची शक्यता आहे. ही गावे पुणे शहरापासून 20 ते 25 किलोमीटरच्या कक्षेत येत आहेत. तसेच या गावांची लोकसंख्या सुमारे 10 ते 12 लाखांवर गेली आहे.
अजित पवारांचे संकेत…
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 1999 पासून मंत्रिमंडळात विविध खाती सांभाळली आहेत. भविष्याचा वेध आणि पूरकघटकांसाठी विकास, अशी त्यांची ख्याती आहे. ते कोणत्याही कार्यक्रमात गेले तरी तिथे ते भविष्यकालीन योजना, विकासकामांचे संकेत आपल्या भाषणातून देतात. त्यामुळे विधानसभेतील त्यांचे वक्तव्य हे नवीन महापालिकेची नांदी ठरणार, अशी चर्चा सुरू झाली आहे.