उदय कबुले; जिल्हा परिषदेत “जल जीवन मिशन’ अंतर्गत कार्यशाळा
सातारा – ग्रामपंचायतींचे आराखडे तयार करताना पाऊस, पाणी संकलन, पाणलोट व्यवस्थापन, पाणी आडवण्याची कामे करुन जल जीवन मिशन आणि “सुजल गाव, स्वच्छ गाव’ योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवा. सुजल व स्वच्छ गावाची जबाबदारी सर्वांची असून लोकांचा सहभाग घेऊन अशा गावांची निर्मिती करावी, असे आवाहन, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले यांनी केले.
जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात जल जीवन मिशन अंतर्गत “सुजल व स्वच्छ गाव’ जिल्हास्तर प्रशिक्षण कार्यशाळेत कबुले बोलत होते. यावेळी उपाध्यक्ष प्रदीप विधाते, शिक्षण समितीचे सभापती मानसिंगराव जगदाळे, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील शिंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे, मनोज ससे, गटविकास अधिकारी उपस्थित होते.
“पावसाचा प्रत्येक थेंब जिरवला पाहिजे. प्रत्येक घटकाला पाणी मिळण्याची गरज असून गावांच्या पाणी योजना करताना सर्व घटकांना प्रशिक्षीत करावे. ग्रामीण भागातील निरोगी व समृध्द जीवनासाठी पाणी आणि स्वच्छता सेवामध्ये सुधारणा करणे काळाची गरज आहे.
प्रशिक्षणाच्या माध्यमातून पाण्याचे महत्व, स्त्रोत बळकटीकरणासाठी करावयाच्या उपाययोजना, पाणी पुरवठा योजनांची देखभाल दुरुस्ती करावी. तसेच पाण्याची गुणवत्ता राखण्यासाठी उपाययोजना कराव्यात, असे आवाहनही कबुले यांनी केले.
“जल जीवन मिशन हा कार्यक्रम प्रत्येक कुटुंबाला वैयक्तीक नळ कनेक्शन देण्यासाठी सुरू केलेला आहे. यासाठी पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत शाश्वत राहणे गरजेचे आहे. पाणलोट, जलसंधारण, मृदसंधारण, स्त्रोत बळकटीकरण, वृक्ष लागवड आदींच्या माध्यमातून पाण्याचे व्यवस्थापन करावे, असे आवाहन संजय भागवत यांनी केले.
“जल जीवन मिशन अंतर्गत 55 लिटर पाणी दिले जाणार आहे. त्यातच गावांची पाण्याची मागणी वाढत चालली असून त्याची पूर्तता होणे गरजेचे आहे. पाणी पुरवठा योजेनेची देखभाल, दुरुस्ती आवश्यक आहे, असे मत मानसिंगराव जगदाळे यांनी व्यक्त केले.
कार्यशाळेत कार्यकारी अभियंता सुनील शिंदे यांनी जल जीवन मिशनचा कृती आराखड्याबाबत मार्गदर्शन केले. भूजल तज्ज्ञ विलास भोसले यांनी पाणलोटचे विविध उपयोग, व स्त्रोत बळकटीकरणाची माहिती दिली. यशदा मास्टर ट्रेनर प्रदीप पाटणकर यांनी पाणी पुरवठा योजना देखभाल, दुरुस्तीचे महत्व सांगितले. राजेश भोसले यांनी जल जीवन मिशन, संजय पवार यांनी घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनबाबत मार्गदर्शन केले.
कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी रवींद्र सोनवणे, ऋषिकेश शिलवंत, गणेश चव्हाण, राजेश इंगळे, निलीमा सन्मुख, सविता भोसले, सचिन जाधव यांनी परिश्रम घेतले. धनाजी पाटील यांनी प्रास्ताविक केले. अजय राऊत यांनी सूत्रसंचालन केले.