सातारा (प्रतिनिधी) – येथील ऐतिहासिक सैनिकी शाळेच्या अंतर्गत विकासासाठी आणि अधिक सुसज्जतेसाठी भरीव निधीची गरज होती. हा प्रश्न आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे सुटला आहे. राज्याच्या अर्थसंकल्पात सातारच्या सैनिक स्कूलसाठी तीनशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्याबद्दल जिल्हावासीयांच्यावतीने आ. शिवेंद्रराजे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड व पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांचे आभार मानले आहेत.
सातारा जिल्हा हा शूरवीरांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्याने देशसेवेसाठी हजारो सैनिक दिले आहेत. सैन्यदलातील अधिकारी घडवणाऱ्या सैनिकी शाळा देशात काही निवडक शहरांमध्ये आहेत. त्यामध्ये सातारा शहराचाही समावेश आहे. सैनिकी शिक्षण देऊन देशरक्षणासाठी शूरवीर, राष्ट्रप्रेमी अधिकारी आणि सैनिक या शाळेमधून घडवले जातात. या सैनिकी शाळेचा अंतर्गत विकास व्हावा, विद्यार्थ्यांसाठी अत्यावश्यक बाबी विकसित व्हाव्यात आणि हे सैनिक स्कूल परिपूर्ण व सुसज्ज व्हावे यासाठी भरीव निधीची आवश्यकता होती.
हा निधी उपलब्ध व्हावा यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला होता. त्यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले असून अर्थसंकल्पीय अधिवेशनात सातारा सैनिक स्कूलसाठी तीनशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थ खाते असून आ. शिवेंद्रराजेंच्या मागणीनुसार ना. पवार यांनी सातारा जिल्ह्याचे अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत. अनेक विकासकामांसाठी निधी दिला आहे.
सैनिक स्कूलसाठीही आ. शिवेंद्रराजे यांच्या मागणीला प्राधान्य देत उपमुख्यमंत्र्यांनी निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी ना. अजित पवार, या निधीसाठी सहकार्य करणाऱ्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड आणि जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांचे जिल्हावासीयांच्यावतीने आभार मानले आहेत.