सातारा – देशाचे तत्कालीन संरक्षण मंत्री व राज्याचे माजी मुख्यमंत्री कै. यशवंतराव चव्हाण यांनी मुहुर्तमेढ रोवलेल्या सातारा सैनिक स्कूलचा नावलौकिक देशभर पोहोचला आहे. या शाळेतील विद्यार्थी सैन्यांमध्ये तसेच इतर क्षेत्रांमध्ये चांगली सेवा बजावत असून याचा महाराष्ट्राला सार्थ अभिमान आहे.
या शाळेच्या विकासासाठी राज्य शासन सर्व मदत करणार असून त्याअनुषंगाने लवकरच मुंबई येथे बैठकीचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे जलसंपदा मंत्री ना. जयंत पाटील यांनी दिली. येथील सैनिक स्कूलचा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा ना. पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला.
यावेळी सैनिक स्कूलच्या प्राचार्य ग्रुप कॅप्टन मनिषा मिश्रा, उप प्राचार्य विंग कमांडर बी. लक्ष्मीकांत, भगतसिंह पाटील, उपशिक्षणाधिकारी रमेश चव्हाण, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील माने आदी उपस्थित होते. ना. पाटील म्हणाले, माझे बंधू या शाळेत शिक्षण घेत असताना 1967 साली मी याठिकाणी पहिल्यांदा आलो होतो. सातारा सैनिक स्कूल ही आदर्श शाळा आहे. या शाळेचा परिसर स्वच्छ आणि येथील वसतिगृहे सर्व सोयीसुविधांयुक्त आहेत.
या शाळेमध्ये महाराष्ट्रातून विद्यार्थी येत असतात या विद्यार्थ्यांना शाळेतून चांगल्या प्रकारे शिक्षण दिले जात असल्याने येथील विद्यार्थ्याचे भविष्य उज्वल आहे. या शाळेतील चार मुले नेव्हीमध्ये रुजू झाल्याने शाळेचा नावलौकिक अजून वाढला आहे. इतर शाळांच्या तुलनेत येथील मुले शार्प आहेत.
या शाळेचा महाराष्ट्राला अभिमान असून शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासनाकडून सर्व ती मदत केली जाईल. राज्याचे अर्थमंत्री ना. अजित पवार यांच्याशी चर्चा करुन निधीची तरतूद केली जाईल, असेही ते म्हणाले.
प्राचार्य ग्रुप कॅप्टन मनिषा मिश्रा म्हणाल्या, सैनिक स्कूल शाळेचा विद्यार्थ्यांचा परीक्षेचा निकाल हा 100 टक्के असतो. या शाळेतील विद्यार्थ्यांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. या शाळेतील विद्यार्थी जास्त करुन एनडीएमध्ये भरती होतात. या शाळेतून युपीएसीचीही अभ्यासाची तयारी करुन घेतली जाते. शाळेत झालेल्या विकास कामांची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
या कार्यक्रमात ना. जयंत पाटील यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. शाळेतील प्रार्थना प्रांगणाच्या नुतनीकरणाचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सैनिक स्कूलमधील विद्यार्थी, विद्यार्थ्यांचे पालक यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी ना. पाटील यांनी सैनिक स्कूलच्या प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केले. यानंतर राष्ट्रीय छात्रसेनेच्या विद्यार्थ्यांनी त्यांना मानवंदना दिली.