नवी दिल्ली -जागतिक महिला दिनी सोमवारी राज्यसभेत महिला आरक्षणाच विषय उपस्थित झाला. संसद आणि विधानसभांमध्ये महिलांना एक-तृतीयांश आरक्षण मिळावे, अशी मागणी विविध पक्षांच्या महिला खासदारांनी केली. लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये महिलांना 33 टक्के प्रतिनिधित्व देण्यासंबंधीचे विधेयक प्रदीर्घ काळापासून रखडले आहे. त्याकडे महिला खासदारांनी लक्ष वेधले.
माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांनी महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण मिळवून दिल्याची आठवण कॉंग्रेसच्या खासदार छाया वर्मा यांनी करून दिली. देशाच्या लोकसंख्येत महिलांचे प्रमाण सुमारे 50 टक्के आहे. त्यामुळे त्याच प्रमाणात महिलांना संसद आणि विधानसभांमध्ये प्रतिनिधित्व मिळावे, अशी भूमिका शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी मांडली.