सासवड – पुरंदर तालुक्यात गेल्या दोन ते तीन वर्षांपासून डाळिंबाच्या बागा वाढल्या आहेत. मात्र, गेल्या वर्षी अतिवृष्टीने आणि यंदा विविध रोगांच्या प्रादुर्भावाने डाळिंब उत्पादक शेतकरी आर्थिक चक्रव्यूहात सापडला आहे. पुरंदर तालुक्यातील 2200 हेक्टरपैकी 800 हेक्टर डाळिंब बागा शेतकऱ्यांनी उपटून टाकल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी 30 कोटी रुपयांची केलेली गुंतवणूक मातीत गेली आहे. शेतकऱ्यांचे अर्थकारण कोलमडून पडले आहेत.
पुरंदर तालुक्यात धालेवाडी, कोथळे, रणमळा, भोसलेवाडी, बेलसर, निळुंज, वाळुज, मावडी कडेपठार या गावांसह 25 ते 30 गावांत डाळिंबाच्या बागा घेतल्या जातात. परंतु येथील शेतकरी अस्मानी संकटांना तोंड देत आहेत. लॉकडाऊनमुळे वाहतूक करता आली नाही. त्यातच रोगराई वाढल्याने बागा तोडाव्यात की काय, असा विचार शेतकरी करीत आहेत.
फेब्रुवारीदरम्यान छाटणी केलेल्या बागांचा बहर सुरू आहे. यानंतर छाटणी करून बहर धरलेल्या बागांचा हंगामासाठी साधारण एक ते दीड महिना लागू शकतो. यावर्षी बुरशीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात फैलावला आहे. तेल्याचे प्रमाण आहे. त्यामुळे फळगळती मोठ्या प्रमाणात होत आहे. यंदा करोना असल्याने खरेदीदार हे बाजारभाव पाडून मागणी करीत आहेत. यात औषध फवारणीचा खर्च पदरात पडत नाही.
मागील वर्षी अतिवृष्टीने कहर केला आहे. यावर्षी ऊन-पावसाच्या लंपडावामुळे रोगराईला वातावरण पोषक आहे. शास्त्रोक्त पद्धतीने दोन झाडांमधील अंतर योग्य प्रमाणात अपेक्षित आहे. त्याचा परिणाम झाडांवर होत आहे. हवा खेळती राहण्यासाठी झाडांमधील अंतर महत्वाचे ठरते.
सध्या पुरंदर तालुक्यात रिमझिम पाऊस असल्यामुळे तेल्या रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. काळा डाग पडण्याची शक्यता आहे. बुरशी रोग वाढेल. त्यामुळे शेतकऱ्यांनी योग्य ती खबरदारी घ्यावी.
– अंकुश बरडे, तालुका कृषी अधिकारी, पुरंदर.
वातावरण बदलामुळे काळा डाग व बुरशी रोग वाढत आहे. औषध फवरणी सातत्याने करावी लागते आहे. डाग पडलेल्या फळाला प्रति किलो 3 रुपये बाजारभाव मिळतो. मध्यम पळाला 25 रुपये प्रति किलो बाजारभाव आहे. चांगल्या प्रतिकिलोचा माल 60 किलो रुपयांपर्यंत बाजारभाव आहे. परंतु हा माल संपूर्ण बागात 10 टक्के इतका आहे. सध्या डाळिंबावर मोठे संकट आहे. खर्च भागत नाही.
– अशोक बनकर, प्रगतशील शेतकरी निळुंज
दीड लाखांचा खर्च पाण्यात
चार ते पाच वर्षांपूर्वी सुमारे 2200 हेक्टरवर बागा होत्या. यंदा लॉकडाऊन व हवामानातील बदल, अतिवृष्टी, तेल्याचा प्रादुर्भाव आदी कारणांमुळे सरासरी 800 हेक्टर बागा भुईसपाट झाल्या आहेत. सध्या तालुक्यात सरासरी 1 हजार 460 हेक्टरवर बागा शिल्लक आहेत. 2 हजार 924 शेतकऱ्यांची डाळिंब बाग सुस्थितीत आहेत. त्यातील निम्म्या क्षेत्रात तोडणी सुरू आहे. प्रत्येकी एकरामध्ये एका झाडाला साडेचारशे ते पाचशे रुपये खर्च येत आहे.
साधारणत: 275 ते 300 झाडे असतात. दीड लाख रुपये एकरी खर्च येत आहे. शेतकऱ्यांनी आठशे हेक्टरमधील बागा उखडून टाकल्या आहेत. त्यामुळे 30 कोटी रुपयांची गुंतवणूक पाण्यात गेल्यामुळे शेतकरी वैफल्यग्रस्त झाला आहे. सध्या 20 किलोच्या क्रेटला 500 ते 600 रुपये बाजारभाव मिळत आहे. या बाजारभावांमध्ये शेतकऱ्याचा खर्च देखील निघत नाही. इतकी विदारक अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे. सरासरी क्रेटला दोन ते अडीच हजार रुपये बाजारभाव मिळाला तरच शेतकऱ्यांना उभारी मिळणार आहे.