केंद्र सरकारकडून तात्काळ मदतीची अपेक्षा
नवी दिल्ली – करोना व्हायरसमुळे पर्यटन, प्रवास आणि हॉटेल उद्योग ठप्प झाला आहे. यामुळे या क्षेत्रातील 70 टक्के म्हणजे 3.8 कोटी लोक बेकार होणार असल्याचे या उद्योगांकडून सांगण्यात आले आहे.
द फेडरेशन ऑफ असोसिएशन ऍण्ड इंडियन टुरिझम अँड हॉस्पिटॅलिटी या संस्थेने या संदर्भात माहिती संकलित केली असून, केंद्र सरकारने पुढील 12 महिने हा उद्योग टिकावा यासाठी मदत केली नाही तर ह्या क्षेत्राचे भयंकर नुकसान होणार असल्याचे म्हटले आहे. पुढील बारा महिने केंद्र सरकारने या उद्योगातील कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये काही रक्कम दिली तरच हा उद्योग टिकून राहू शकतो. भारतातील सर्व शहरांमध्ये या क्षेत्रातील कंपन्या दिवाळखोरीत निघण्याची शक्यता आहे.
या क्षेत्रात 5.5 कोटी लोक काम करतात. यातील 70 टक्के लोकांवर परिणाम होण्याची शक्यता असल्याचे या संस्थेने म्हटले आहे.
या क्षेत्रातील रोजगारावर तर अगोदरच परिणाम झालेला आहे. औपचारिक आणि अनौपचारिक रोजगारही कमी होऊ लागले आहेत. या उद्योगातून परदेशी पर्यटकांद्वारे 28 अब्ज डॉलरची उलाढाल होते . तर देशांतर्गत उलाढाल दोन लाख कोटी रुपयांवर आहे. मात्र हा व्यवहार एक महिन्यापासून ठप्प झाल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारासह कर्जाचे हप्ते देणे आणि इतर पेमेंट वर परिणाम होऊ लागला आहे. त्यासाठी कमीत कमी बारा महिने तरी कर्जाचे हप्ते देण्याबाबत सवलत देण्याची गरज असल्याचे या संघटनेने म्हटले आहे. त्याचबरोबर या क्षेत्राकडून पगार देण्यातही अडचण येणार आहे. त्यामुळे तूर्तास सरकारने रोजगार हमी योजनेच्या धर्तीवर या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीच्या खात्यावर काही रक्कम टाकण्याची गरज असल्याचे या संस्थेने म्हटले आहे.