कराड – राज्यातील समविचारी शेतकरी संघटनांना सोबत घेऊन विधानसभेच्या सर्व 288 जागा लढवणार असल्याची घोषणा शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत केली. बळीराजा शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष बी. जी. पाटील, केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील, प्रदेश कार्याध्यक्ष भीमाशंकर बिराजदार, जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला, उपाध्यक्ष उत्तम खबाले, क्रांतिसिंह नाना पाटील ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष विजय पाटील, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विकास जाधव, उपाध्यक्ष हिंदुराव पाटील, प्रहारचे जिल्हाध्यक्ष अजित बानुगडे, तालुकाध्यक्ष तात्या पाटील, किशोर जाधव, प्रकाश फडतरे उपस्थित होते.
रघुनाथदादा पाटील म्हणाले, सरकारच्या धोरणांमुळे राज्यातील अनेक शेतकरी कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. त्यामुळे सरकारला जागा दाखवण्याची वेळ आता आली आहे. यासाठी राज्यातील समविचारी शेतकरी संघटना एकत्र येऊन विधानसभेच्या 288 जागा लढण्याचा निर्धार केला आहे. यामध्ये शेतकरी संघटना, बळीराजा शेतकरी संघटना, प्रहार संघटना, क्रांतिकारी कम्युनिस्ट पक्ष, बळीराजा पक्ष यांचा समावेश आहे. जेवणाचे पूर्ण भरलेले ताट, हे चिन्ह निवडणूक आयोगाकडे मागण्यात येणार आहे. कराड दक्षिण मतदारसंघातून पंजाबराव पाटील तर उत्तरमधून साजिद मुल्ला हे निवडणूक लढवणार आहेत. पंजाबराव पाटील म्हणाले, भाजप सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत. अतिवृष्टी, दुष्काळ, शेतमालाला मिळत नसलेला भाव यामुळे सध्या शेतकरी मेटाकुटीला आला आहे. शेतकऱ्यांनी आपल्या न्याय्य हक्कांसाठी या लढ्याला साथ द्यावी.