उमेदवारी मिळविण्यासाठी इच्छुकांनी बांधली मोट
– राहुल शिंदे
नीरा – विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यापासून पुरंदरचे राजकीय वातावरण ढवळू लागले आहे. वरवर पाहता सर्व काही शांत दिसत असले तरी तालुक्यातील प्रमुख चार पक्षांनी आपल्यालाच ही जागा मिळावी म्हणून मोट बांधली आहे. मात्र, यामध्ये मनसे खूपच मागे पडल्याचे दिसत आहे. तालुक्यातील सर्वच पक्षांतील इच्छुकांना आता आमदारकीचे स्वप्न पडू लागले आहे. पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्यास वेळप्रसंगी पक्ष बदलण्याची किंवा अपक्ष लढण्याची तयारी इच्छुकांनी केली आहे.
स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराजांचे जन्मस्थळ असलेल्या पुरंदरचा राजकीय इतिहास तसा फारसा राजकीय उलथा पालथीचा नाही. सहा पंचवार्षिक म्हणजे तब्बल 30 वर्ष जनता दलाचे दादा जाधवराव यांची इथे एक हाती सत्ता होती. त्यांच्यापूर्वी कॉंग्रेसचे आमदार होते. 2004च्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे अशोकराव टेकवडे यांनी विजय मिळविला. त्यानंतर झालेल्या 2009 ला 23469 मतांच्या फरकाने विजय शिवतारे यांनी प्रथम विजय मिळवला. त्यानंतर 2014 च्या निवडणुकीत शिवतारे यांनी दुसऱ्यादा विजय मिळवून राज्य सरकारमध्ये राज्यमंत्रीपदही मिळविले.
शिवतारे मंत्रिपदी विराजमान झाल्याने लोकांच्या अपेक्षा वाढल्या होत्या. आता लोकांच्या किती अपेक्षा पूर्ण झाल्या हे मतमोजणीनंतरच समजणार आहे. मात्र, सध्या तिकीट नक्की कोणाला मिळणार यावरच तालुक्यात मोठी चर्चा सुरू आहे. शिवसेना-भाजपचे जागा वाटप झाले असले तरी कोणत्या जागा कोणाला जाणार याबाबत मात्र, अजून कोणताच नेता काही बोलताना दिसत नाही. उलट पुरंदरमध्ये भाजपचे कार्यकर्ते आजही आक्रमकपणे पुरंदरच्या जागेवर दावा करीत आहेत.
भाजपने बूथ बांधणी जोरदार केली आहे. पालकमंत्र्यांच्या माध्यमातून वैयक्तिक लाभांची अनेक कामे भाजपने केली.
तालुक्यात अनेक ठिकाणी रस्ते करण्यासाठी पालकमंत्र्यांनी पुढाकार घेतला. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून ही कामे पूर्ण केली. साकुर्डे-पिंगोरी-वाल्हा या दुर्गम भागातील रस्ता चंद्रकांत पाटलांनी मंजूर केला. त्याचबरोबर तालुक्यातील अनेक देवस्थानांना ग्रामीण विकास मंत्रालयाच्या माध्यमातून पंकजा मुंडे यांनी ब व क दर्जा देऊन विकासाच्या मार्गावर आणून सोडले आणि त्याच जोरावर या पक्षाचे तालुकाध्यक्ष सचिन लंबाते पुरंदरच्या जागेवर दावा करीत आहेत.
दुसरीकडे शिवसेनेचे आमदार विजय शिवतारे ही निवडणूक लढणार आहेत. आपल्या पाच वर्षांच्या काळात पुरंदरमधील झालेली सर्व कामे आपण केल्याचे सांगत शिवतारे पुरंदरचे पुन्हा आमदार होऊ पाहत आहेत, असे असले तरी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवतारे यांच्या नावाला हिरवा कंदील येणे बाकी आहे. शिवतारे व मुख्यमंत्री यांचे मागील काळातील घनिष्ठ संबंध पाहता. यावेळी उद्धव ठाकरे खांदेपालट करणार की ही जागा भाजपला सोडणार की, शिवतारे यांच्यावर पुन्हा विश्वास दाखवणार याबाबत पुरंदरकरांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
दुसरीकडे कॉंग्रेस-राष्ट्रवादीमध्ये मात्र सर्वकाही आलबेल आहे असे नाही. कॉंग्रेसचे संजय जगताप यांनी गावोगावी जाऊन आपली उमेदवारी जाहीर केली असली, तरी संपूर्ण गावभेट दौऱ्यात त्यांच्याबरोबर कॉंग्रेसचा हाताचा पंजा मात्र दिसत नव्हता. त्यामुळे संजय जगताप नक्की कोणत्या पक्षाकडून उभे राहणार याबाबत लोकांमध्ये मोठी उत्सुकता आहे. पक्षीय वाटाघाटीत ही जागा राष्ट्रवादीकडे गेल्यास तिकडूनही उभे राहण्याची तयारी कॉंग्रेस कार्यकर्त्यांची आहे. काही होवो संजय जगताप यांना आमदार करायचेच असा चंगच येथील जगताप प्रेमींनी बांधला आहे. वेळ प्रसंगी अपक्ष लढण्याची तयारी त्यांनी ठेवल्याचे दिसते.
मनसेला ग्रहण
इकडे राष्ट्रवादीमधील एक गट मात्र जगताप यांना प्रचंड विरोध करताना दिसतोय. त्यासाठी त्यांनी पक्ष श्रेष्ठीकडे पुरंदरच्या जागेचा हट्टच धरला आहे. त्यामुळे पक्षाच्या नेत्यांची पुन्हा द्विधा अवस्था झाल्याचे पाहायला मिळते. ही जागा कॉंग्रेसला सुटली तर तालुक्यातील नेत्यांना एकत्र आणण्याचे कठीण काम राष्ट्रवादीला करावे लागणार आहे. पुरंदरमध्ये एकेकाळी चांगले वजन असणारा मनसे पक्ष आता नावालाच उरला आहे. अर्थात जुना जनता दल बाबाराजेच्या मागे उभा राहिला होता. मात्र बाबाराजे जाधवराव यांच्या धरसोड वृत्तीमुळे मनसेला पुरंदरमध्ये ग्रहण लागले असून त्याची दखल घ्यावी इतपत ही ताकत उरली नाही. त्यामुळेच त्यांच्याकडून भाजपमध्ये जाण्यासाठी धडपड सुरू आहे. दादा जाधवराव यांच्या इतके प्रभावी राजकारण त्यांना साधता आले नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पुरंदरच्या राजकारणात मोठी अनिश्चितता पसली असून आता कोणाला तिकीट मिळणार? पुरंदरचा आमदार नक्की कोण होणार? याबाबत पुरंदरकरांच्या मनात मोठे कुतूहल निर्माण झाली आहे.