आळंदी -आषाढी वारीनिमित्त आळंदीत दरवर्षी सात ते आठ दिवस आधीपासून भक्तीचा मळा फुलायला लागतो. तर तीन दिवस आधीपासून त्याला उधाण आलेले असते. माउलींच्या प्रस्थानानिमित्त अलंकापुरीत दरवर्षी लाखो वैष्णवांच्या मांदियाळीमुळे तीन दिवसांत सुमारे 20 ते 25 कोटींची उलाढाल होत असते.
मात्र, यंदा करोनामुळे ही उलाढाल झालीच नसल्याने सर्वच क्षेत्रांना नुकसानीचा जबर फटका बसला आहे. शहरातील टाळ, मृदंग, वीणा, तबला, हार्मोनियम आदी केंद्रातदेखील साहित्याचा साठा आणि देखभाल दुरुस्तीचे कामांनी वेग पकडलेला असतो. तर वारीच्या 10 ते 15 दिवस अगोदरपासून दुकानांमध्ये विविध साहित्य विक्रीसाठी उपलब्ध असतात.
मात्र, यंदा दि. 23 मार्चपासून लॉकडाऊन सुरू झाल्याने दुकानदारांना कोणत्याही कामाची सवड मिळाली नाही. वारीसाठी लागणाऱ्या वाद्याची निर्मिती व दुरुस्ती आळंदीत बारमाही सुरू असते. त्यामुळे दुकानदार कच्चा माल बऱ्यापैकी दुकानांमध्ये साठवून ठेवतात. यंदाही फेब्रुवारी व 23 मार्चच्या अगोदर जवळपास 25 ते 30 टक्के जादा मालाची मागणी काही दुकानदारांनी केली होती.
त्यामुळे आता जादाचा 25 ते 30 टक्के माल हा अंगावर पडल्याने नुकसान झाल्याचे दुकानदारांनी सांगितले. तर वारीसाठी वाद्य बनवणे व दुरुस्तीसाठी दुकानदार हंगामी कामगार भरती करीत असतो. त्यामुळे त्या मजुरांनाही दोन पैसे अधिक मिळतात पण यंदा करोनामुळे या कामगारांच्या हाताला काम मिळाले नसून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
त्याचबरोबर आळंदीतील फुले, माळा, खेळणी, चप्पल, मिठाई, फळ विक्रेते, छत्री, ताडपत्री, भगवे झेंडे, काठी, साखर, फुटाणे, गॅरेज, मोबाइल दुरुस्ती, रिक्षा आदी सर्वच छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना जबर फटका बसला आहे.
पीएमपीलाही उत्पन्न नाही
आषाढी वारीसाठी पीएमपीच्या नियमितपेक्षा जादा बसेस पुण्यातील विविध ठिकाणांहून आळंदीत सोडण्यात येतात. तर प्रत्येक फेरी ही जाताना व येताना पूर्णक्षमतेने भरलेल्या असततात त्यामुळे पीएमपीला लाखो रुपयांचे उत्पन्न मिळत असते. मात्र, यंदा काहीही उत्पन्न मिळालेले नाही.