नवी दिल्ली – बुधवारी मणिपूरबाबत लोकसभेत बोलताना कॉंग्रेस खासदार राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर घणाघाती टीका केली. राहुल गांधी यांच्या भाषणानंतर सत्ताधाऱ्यांनी आक्षेप घेत गोंधळ केला. सत्ताधाऱ्यांच्या आक्षेपानंतर राहुल गांधी यांच्या या भाषणातील एकूण 24 शब्द कामकाजातून वगळण्यात आले आहेत.
राहुल गांधीनी आपल्या भाषणात “हत्या’ हा शब्द 15 वेळा वापरला होता. तसेच केंद्रीय मंत्री किरेन रिजीजू यांनी देखील “हत्या’ हा शब्द वापरला होता तो संसदेच्या कामकाजातून वगळण्यात आला आहे.
हत्या शब्दाबरोबर कत्ल, देशद्रोही शब्द दोनदा, आणि मर्डर, हत्यारा, हे शब्द एकदा वापरण्यात आले होते. राहुल गांधी यांनी खासदारकी परत मिळाल्यानंतर संसदेत दुपारी 12:09 ते दुपारी 12:46 पर्यंत एकूण37 मिनिटे भाषण केले.
संसद टीव्हीकडून भेदभाव…
लोकसभेतील कॉंग्रेसचे नेते अधीर रंजन यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहिले आहे. संसद टीव्हीवर राहुल गांधी यांचे भाषण कापून दाखवल्याबद्दल कॉंग्रेस नेते अधीर रंजन यांनी अध्यक्षांना पत्र लिहीत नाराजी व्यक्त केली.
तसेच संसद टीव्ही भेदभाव करत असल्याचा गंभीर आरोप अधीर रंजन यांनी केला आहे. तसेच कॉंग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी राहुल गांधींना पूर्णवेळ संसद टीव्हीने दाखवले नसल्याचा दावाही केला आहे.
भाषणादरम्यान राहुल यांना केवळ 40 टक्क्यांपेक्षा कमी काळ स्क्रिनवर दाखवले. त्यामुळे पंतप्रधान मोदींना नेमकी कशाची भिती वाटतेय असा सवालही रमेश यांनी व्यक्त केला.