पुणे – परप्रांतीय मजुरांना त्यांच्या राज्यात पाठविण्यास सुरुवात झाली आहे. त्यानुसार मुळशी तालुक्यातील 24 मजुरांना राजस्थान येथे बसने पाठविण्यात आले आहे. राजस्थान सरकारकडून या नागरिकांना पाठविण्याची परवानगी मिळाली. त्यानुसार या मजुरांची वैद्यकीय तपासणी केली असून त्यांना वैद्यकीय प्रमाणपत्र देण्यात आले आहे. पुणे जिल्हा प्रशासनाने या बसला परवानगी असल्याचे पत्र दिले, अशी माहिती मुळशीचे तहसिलदार अभय चव्हाण यांनी दिली.
मुळशी तालुक्यात विविध औद्योगिक कंपन्या, आयटी कंपन्यांची संख्या मोठी असल्याने परप्रांतीय मजुरांची संख्या सुद्धा मोठी आहे. मुळशी तालुक्यात 35 हजार परप्रांतीय नागरिकांनी त्यांच्या मूळगावी जाण्यासाठी नोंदणी केली आहे. या नागरिकांना त्यांच्या राज्यात जाण्यासाठी आवश्यक ती परवानगी मिळण्यासाठी संबंधीत राज्यांकडे प्रस्ताव पाठविण्यात येत आहे. त्या राज्यांनी परवानगी दिल्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून त्या नागरिकांना जाण्यासाठी परवानगी देण्यात येत असल्याचे तहसिलदार चव्हाण यांनी सांगितले.
मजुरांनी स्थलांतर करू नये…
जिल्हा व राज्याच्या विविध भागांतून मजुरांचे पायी चालत जाऊन होणारे स्थलांतर रोखण्यासाठी पुणे जिल्हा प्रशासनाकडून विविध उपाय करण्यात येत आहे. लॉकडाऊनमध्ये अनेक मजुरांना निवासगृहांचा आधार मिळत आहे. आता तिसऱ्या टप्प्यात लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथिलता देण्यात आल्याने मजुरांना इथे रोजगार मिळेल, त्यामुळे मजुरांनी जाऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले आहे.