विषारी कणांमुळे गंभीर आजारांना निमंत्रण
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीमध्ये थंडी वाढली असून सगळीकडे धुक्याची चादर पसरली आहेत. परंतु, या धुक्यांमध्ये 22 प्रकारचे विषारी रासायनिक कण आढळले असून हे प्राणघातक असल्याचे सिध्द झाले आहे. तज्ज्ञांच्या मते, अशा हवेमध्ये श्वास घेतल्याने आरोग्यासंबंधी समस्या उद्भवू शकतात. दिल्लीतील हवेची गुणवत्ता सहा मापदंडांवर निश्चित केली जाते. सामान्य प्रदूषणाची पातळी प्रदूषण कण पीएम 10 आणि पीएम 2.5 कणांच्या प्रमाणाच्या आधारावर भिन्न श्रेणींमध्ये वर्गीकृत केली जाते.
पीएम 10 आणि पीएम 2.5 कण हे प्रदूषण करणाऱ्या कणांचे आकार आहेत. तज्ञांच्या मते, या कणांमध्ये 20 पेक्षा जास्त रासायनिक पदार्थ, वायू किंवा धातूचे कण अस्तित्त्वात आहेत जे प्राणघातक आहेत. विज्ञान आणि पर्यावरण केंद्रातील वायू प्रदूषण नियंत्रण युनिटचे वरिष्ठ कार्यक्रम व्यवस्थापक विवेक चट्टोपाध्याय यांनी सांगितले की, हे कण आरोग्यास हानी पोहचवतात. त्यामुळे या वातावरणात मास्कचा वापर केला पाहिजे.
तज्ज्ञाच्या मते, धूळ किंवा ओलावामध्ये असलेले कण सहसा हानिकारक नसतात. परंतु, जेव्हा घातक रसायनांचा थर त्यांच्यावर येतो किंवा हानिकारक धातूंचे कण त्यांच्यामध्ये मिसळतात तेव्हा ते आरोग्यासाठी धोकादायक असतात. यामुळे गंभीर आजार होण्याची शक्यता असते.
दिल्लीतील हवेत असलेले विषारी कण –
अमोनिया, बेंझिन, नायट्रोजन डाय ऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड, ओझोन, पी-जाइलीन, सल्फर डाय ऑक्साईड, टाल्यूईन, कार्बन मोनोऑक्साइड, झिंक, सेलेनियम, लीड, निकेल, सोडियम, मॅगनीज, मॅग्नेशियम, पोटॅशियम, लोह, तांबे, क्रोमियम, कॅडमियम, कॅल्शियम