मुंबई – लॉकडाऊनमुळे महाराष्ट्रातील 203 विद्यार्थी रशियात अडकून पडले आहेत. हे सर्व विद्यार्थी रशियातील ओएसएच स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेत असून, त्यांनी सरकारकडे मायदेशी परतण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी केली आहे.
जगभरात अडकलेल्या भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. लॉकडाऊनमुळे युएई, कतार, सौदी अरेबिया, यूके, सिंगापूर, युनायटेड स्टेट्स, फिलीपिन्स, बांगलादेश, बहरीन, मलेशिया, कुवेत आणि ओमान या 12 देशात 14 हजार 800 भारतीय नागरिक अडकून पडले आहेत. त्यांना आणण्यासाठी 7 मे पासून विशेष विमानांच्या फेऱ्या सुरू आहेत. 14 मे पर्यंत विमानांच्या 64 फेऱ्यांमधून हे सर्व नागरिक मायदेशी परततील.
विदेशातून आणण्यात या येणाऱ्या नागरिकांच्या यादीत रशियातील या विद्यार्थ्यांचा समावेश नाही. महाराष्ट्रातील 203 विद्यार्थ्यांसह देशभरातील चार हजार विद्यार्थी रशियात अडकून पडले आहेत. भारतीय दूतावासाकडील यादी अपडेट नसल्याने हे विद्यार्थी कसे मायदेशी परतणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
कल्याणमधील शिवसेनेच्या कार्यकर्त्या शिरीन पठाण यांची मुलगी सानिया ही रशियातील ओएसएच विद्यापीठात शिक्षण घेत आहे. तिने आईशी संपर्क साधून घरी येण्याची इच्छा व्यक्त केली. तिच्यासारखेच 203 विद्यार्थी महाराष्ट्रातील आहेत. निर्वासन अर्जात फ्लाईट किंवा क्वारंटाइन एक्सप्रेस असे पर्याय आहेत. याचा खर्च विद्यार्थ्यांना परवडणारा नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्यांना परत आणण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी माजी नगरसेवक रवी पाटील यांनी केली आहे.