मजूर लोकांचा सीमेवरच ठिय्या
अंबाला – पंजाबातील शेकडो स्थलांतरित मजुरांनी पायी चालत जाऊन काल शुक्रवारी हरियाना राज्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी त्यांना सीमेवरच अडवले. त्यांच्याकडे हरियानात येण्याचा कोणताही अधिकृत परवाना नसल्याने त्यांना तेथे अडवण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे हे मजूर शांभु गावाजवळ पंजाब-हरियाना सीमेवर अडकून पडले आहेत. हे मजूर बहुतांशी उत्तरप्रदेश व बिहारचे असून त्यांना त्यांच्या राज्यात परत जायचे आहे. आम्ही हरियानात मुक्काम ठोकणार नाही पण आम्हाला आमच्या राज्यात जाऊद्या अशी त्यांची मागणी आहे.
हे मजूर अनेक मैलांची पायपीट करून तेथे आले आहेत पण पोलिसांनी त्यांना वाटतेच अडवल्याने त्यांचे हाल आणखीनच वाढले आहेत. आमच्याकडे पैसा नाही आणि रोजगारही नाही त्यामुळे आम्हाला आता अडवू नका अशी गयावया या लोकांनी पोलिसांकडे केली. आम्ही गेले अनेक दिवस उपाशी आहोत. त्यामुळे आता आम्हाला गोळ्या तरी घाला किंवा येथून परत तरी जाऊद्या असा निर्वाणीचा इशाराही या लोकांनी पोलिसांना दिला. त्यामुळे पोलीस यंत्रणाही हतबल झालेली दिसली. यातील अनेक मजुरांना त्यांच्या घरमालकांनी भाडे दिले नाही म्हणून घर खाली करायला भाग पाडले आहे अशी तक्रार केली आहे.
काही मजुरांनी सांगितले की हरियानातील पोलीस आम्हाला तिकडे येऊ देत नाहीत आणि आता पंजाबातील पोलिसही आम्हाला परत घ्यायला तयार नाहीत अशी आमची भीषण द्विधा अवस्था झाली आहे. या भागातील स्थानिक भाजप आमदार असीम गोयल यांनी या मुजरांची भेट घेतली. पण त्यांनी त्यांच्या स्थितीवर काही उपाययोजना करण्याऐवजी या मजुरांना पंजाब सरकारनेच त्यांच्या राज्यातून बाहेर जाणे भाग पाडले आहे असा राजकीय आरोप केला. त्यांच्या आरोपांचा पंजाब सरकारने इन्कार केला आहे.