जकार्ता – इंडोनेशियामध्ये सुलावेई बेटावर मुसळधार पावसामुळे आणि भूस्खलनामुळे आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू झाला आहे. तर पुरामुळे विस्थापित झालेल्या नागरिकांच्या शोधासाठी मदत आणि बचाव कार्य तातडीने हाती घेण्यात आले आहे.
सुलावेई बेटावरच्या नॉर्थ लुवान जिल्ह्यामध्ये आलेल्या पुरामध्ये बेपत्ता झालेल्या 23 जणांचा शोध घेण्याचे काम अजूनही सुरू आहे, असे आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रवक्त रादितिया जाती यांनी म्हटले अहे.
या जिल्ह्यातील काही गावांमध्ये घरे आणि वाहनांचे मोठे नुकसान झाले असून काही वाहने चिखलामध्ये निम्म्यापेक्षा अधिक रुतून बसली आहेत. स्थानिक विमानतळाच्या धावपट्टीवरही वाहात आलेला चिखल पसरला आहे. त्यामुळे विमान वाहतूक बंद ठेवावी लागली आहे.
सुलावेई जिल्ह्यातील तीन प्रमुख नद्यांना पूर आला आहे. त्यामुळे 655 पेक्षा अधिक नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करावे लागले आहे. इंडोनेशियामध्ये पावसाळ्यामध्ये पूर आणि भूस्खलनासारख्या आपत्ती येणे ही नित्याची बाब आहे.
जंगलांची वारेमाप तोड करण्यात आल्यामुळे जमिनीची धूप होऊन पुराचे पाणे थेट गावांमध्ये घुसण्याचे प्रकार वाढीला लागले आहेत. जानेवारी महिन्यात राजधानी जकार्तामध्ये आलेल्या पुरात 65 जण मरण पावले होते.